कोल्हापूर : गणेशोत्सव, दिवाळीसारख्या सण आणि सुट्टीच्या कालावधीत कोल्हापूर-मुंबई मार्गावर विशेष रेल्वे गाड्या सोडा, अशी सूचना आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी मुंबईत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. कोल्हापूरच्या वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुविधांचा विस्तार करण्यासाठी त्यांनी बैठक घेतली. यावेळी मुंबई येथील कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोरोना काळात बंद झालेली मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस पूर्ववत मुंबईपर्यंत सुरू करा. ती मुंबईपर्यंत सध्या सोडणे अशक्य असल्यास ती किमान कुर्ला किंवा पनवेलपर्यंत न्या. याबाबतच्या पर्यायांवर १५ दिवसांत ठोस निर्णय घ्या, असे सांगत आबिटकर म्हणाले, कोल्हापूर-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू करा. महालक्ष्मी एक्स्प्रेसचा वेग वाढवा, कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, कोल्हापूर-वैभववाडी आणि कोल्हापूर-बेळगाव रेल्वेमार्गांचे सर्वेक्षणाला गती द्या. कोल्हापूर स्थानकावरील प्रस्तावित विकासकामे तातडीने पूर्ण करा, अशी सूचना केल्या. यावेळी महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव, उपमहाव्यवस्थापक के. के. प्रवासी संघाचे अध्यक्ष ॲड. चंद्रकांत निकम, सचिव ज्योतिबा जाधव, उपाध्यक्ष वसंतराव पुरीबुवा, संचालक सतीश मिस्त्री, पारधे, सुहास शिंदे व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
शनिवार-सोमवार जादा गाड्या
बैठकीनंतर रेल्वे प्रशासनाने मुंबई-कोल्हापूर व कोल्हापूर-मुंबई मार्गावर शनिवार दि.१२ व सोमवार दि.१४ रोजी एकूण चार जादा गाड्याचे नियोजन केले आहे. दि.१२ व दि.१४ रोजी गाडी क्रमांक 01417 ही विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी अडीच वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी कोल्हापुरात पोहचेल.गाडी क्रमांक 01418 विशेष गाडी कोल्हापूर येथून दि. १२ व दि. १४ रोजी रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी दीड वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहचणार आहे.