कोल्हापूर : सुनील सकटे
राज्यात आणि जिल्ह्यात विद्युत अपघातात अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे विद्युत अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी महावितरणच्या कोल्हापूर मंडळाने विद्युत वाहिन्यांवर स्पेसर बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
या स्पेसरमुळे एखादी वाहिनी तुटल्यास ती रस्त्यावर अथवा जमिनीवर लोंबकळत राहणार नाही. तुटलेली विद्युत वाहिनी वरच्या वर राहिल्याने अपघातांना आळा बसण्यास मदत होणार आहे. यासाठी जिल्ह्यात सुमारे २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.
महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तिन्ही वीज कंपन्यांच्याअखत्यारित मागील पाच वर्षांत १६ हजार ८५४ अपघात झाले आहेत. या अपघातांत ३ हजार २८६ नागरिक मृत्यू पावले, तर २ हजार ८५४ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. ६ हजार ५२८ जनावरे दगावली आहेत, तर ३९ जनावरे जखमी झाली आहेत.
महावितरणच्या कार्यक्षेत्रात मृतांची संख्या सर्वाधिक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही अपघातांचे प्रमाण दुर्लक्षित करण्यासारखे नाही. शहरासह ग्रामीण भागात विद्युत तारांचा झोळ जास्त असल्याने तार तुटल्यास थेट जमिनीवर, शेतात पडते. अशा तारेस स्पर्श होऊन अपघात होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे महावितरणने या विद्युत वाहिन्यांना स्पेसर बसविण्याचे नियोजन केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर अर्बन, ग्रामीण विभाग एक, ग्रामीण विभाग दोन, जयसिंगपूर, इचलकरंजी, गडहिंग्लज असे सहा विभाग आहेत. या सहा विभागांसाठी प्रत्येकी ४० लाख रुपयांची तरतूद केली आहे. जिल्ह्यात दोन कोटी ४० लाख रुपये खर्चुन हे स्पेसर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे वीज अपघात नियंत्रणात आणण्यास मदत होणार आहे.
दोन खांबांतील अंतर लांब असल्याने अनेक ठिकाणी विद्युत तारांचा झोळ मोठा आहे. त्यामुळे एखादी ता तुटल्यास ती रस्त्यावर पडते. या विद्युत तारांना एकत्रित बांधणारा स्पेसर बसविण्यात येणार आहे. अशावेळी तार तुटल्यास खाली लोंबळकत न पडता ती वरचेवर लटकून राहणार आहे. त्यामुळे तारेस कोणाचा स्पर्ष होउन अपघात होण्याचा धोका टळणार आहे.