आशिष शिंदे
कोल्हापूर : राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थचा कणा असलेल्या दुग्ध व्यवसाय वाढवण्यासाठी आणि पशूंच्या प्रजाती सुधारण्यासाठी राज्य शासनाने उचललेल्या स्मार्ट पावलांना यश मिळत आहे. यामुळे पशुपालकांचा कृत्रिम रेतनाकडे कल मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. गेल्या वर्षी गायींमधील कृत्रिम रेतनाची संख्या विक्रमी 16 लाखांच्या पार गेल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात 2014-15 पासून राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय गोकुळ अभियानाचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.
गायींच्या कृत्रिम रेतनात दरवर्षी होतेय वाढ
पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, गायींच्या कृत्रिम रेतनात दरवर्षी वाढ होत आहे. 2022-23 मध्ये 15.51 लाख असलेली ही संख्या 2024-25 मध्ये 16.42 लाखांवर पोहोचली. यामध्ये शेतकर्यांचा सर्वाधिक कल संकरित प्रजातीकडे दिसून येत असून, त्यांची संख्या 10 लाखांहून अधिक आहे. त्याखालोखाल देशी गायी (4.08 लाख) आणि विदेशी गायींचा (2.20 लाख) क्रमांक लागतो. म्हशींमधील कृत्रिम रेतनाचे प्रमाणही 6.85 लाखांच्या घरात आहे.