कोल्हापूर : निवडणूक आयोगामार्फत मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम सुरू झाली आहे. त्याद्वारे जिल्ह्यासह शहरातील बोगस मतदान कायमचे हद्दपार करण्याची सुवर्णसंधी आली असून आपल्या भागातील बूथ लेव्हल ऑफिसरशी संपर्क साधून स्वत: भागातील या मोहिमेत सहभागी व्हा. प्रत्यक्ष ऑन फिल्ड अभ्यासपूर्ण काम करून मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करत विरोधकांचे बोगस मतदानाचे मनसुबे उधळून लावा, अशी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसैनिकांना केली.
सर्किट हाऊस येथे शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांची बैठक झाली. आ. क्षीरसागर म्हणाले, गेली अनेक वर्षे बोगस मतदानाचा खेळ विरोधकांकडून सुरू होता. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता सुमारे 9 लाख मतदारांचे मॅपिंग होत नाही. यामध्ये कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील संख्या प्रत्येकी एक लाखांवर आहे. विरोधकांचे बोगस मतदानाचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी यादीतील डेटाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. एकाच मतदाराची नावे वेगवेगळ्या केंद्रांवर किंवा वॉर्डमध्ये आहेत का, याची तांत्रिक तपासणी करा.
गावात किंवा शहरात न राहणाऱ्या व्यक्तींची नावे यादीतून वगळण्यासाठी बीएलओकडे पाठपुरावा करा. एकाच पत्त्यावर संशयास्पदरीत्या जास्त मतदार नोंदणी असल्यास त्याचे प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करा. त्यामुळे बनावट मतदानाला आळा बसेल.
यावेळी शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, अभिजित खतकर, अश्किन आजरेकर, अंकुश निपाणीकर यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, नगरसेवक वैभव माने, मंगल साळोखे, वंदना मोहिते, संगीता सावंत, रत्नेश शिरोळकर, महानगरप्रमुख शिवाजी जाधव उपस्थित होते.