Gopal Samaj Kalubai Temple 
कोल्हापूर

Gopal Samaj Kalubai Temple | राहती घरं ठेवली गहाण; उभारलं काळूबाईचं भव्य मंदीर, दुर्लक्षित गोपाळ समाजानं घडविला इतिहास

Gopal Samaj Kalubai Temple | देशात मंदिरे भक्ती भावाने उभारली जातात, पण जेव्हा एखादा समाज आपली राहती घरे गहाण ठेवून मंदिराचा कळस चढवतो, तेव्हा ती केवळ भक्ती उरत नाही, तर तो त्या समाजाच्या स्वाभिमानाचा हुंकार ठरतो.

पुढारी वृत्तसेवा

नागाव | सुनील कांबळे

देशात मंदिरे भक्ती भावाने उभारली जातात, पण जेव्हा एखादा समाज आपली राहती घरे गहाण ठेवून मंदिराचा कळस चढवतो, तेव्हा ती केवळ भक्ती उरत नाही, तर तो त्या समाजाच्या स्वाभिमानाचा हुंकार ठरतो. ही कहाणी आहे शिरोली पुलाची येथील पारंपारिक 'बँजो ('वाजंत्री ) व्यवसाय करणाऱ्या भटक्या गोपाळ समाजाची, ज्यांनी राजकीय आश्वासनांच्या कोरड्या घोषणांवर अवलंबून न राहता आपल्या कुलदेवतेचे मंदिर स्वकष्टाने पूर्ण केले.

हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली ता. हातकणंगले येथील माळभागावरील गोपाळ समाजाने आपल्या वस्तीत आपल्या कुलदैवत आई काळूबाईचे मंदिर २१ लाख ५० हजार रुपये खर्च करून स्वकष्टाने मंदिराची उभारणी केली आहे यासाठी शिरोली येथील एका पतसंस्थेकडून १५ लाख तर आपल्याच वस्तीतील प्रत्येक व्यक्तीकडून १ हजार रूपये वर्गणी काढून आपल्या कुलदैवताचे मंदिर पुर्ण केले या मंदिराचा कळस १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीच्या शुभदिनी मंदिरावर कळस चढवला जाणार आहे. तर २० फेब्रुवारी रोजी आई काळूबाईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

या गोपाळ वस्तीत जवळपास ४७० लोक आपल्या कुटुंबासह गुण्यागोविंदा राहतात गावातील प्रत्येक समाजातील लोकांच्या वस्तीत त्यांच्या श्रध्देनुसार मंदिरे असून त्या मंदिरात अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रम घेतले जातात पण आपल्या समाजात सामाजिक व धार्मिक कार्यक्रमासाठी हक्काचे मंदिर नाही याची खंत मनात धरून या गोपाळ समाजाने एकत्र येऊन एक धाडसी निर्णय घेत स्वाताची राहती घरे पतसंस्थेकडे तारण ठेवून २१ लाख ५० हजारांचे मंदिर बांधले ते स्व खर्चातून .

शिरोली ग्रामपंचायतीने २००५ मध्ये १५ बाय २५ चे ३० प्लॉट या समाजातील लोकांना देऊन मदतीचा हात दिला . हे लोक अशिक्षित असल्याने ते गावातील लोकांमध्ये वावर नसे पण ते लोक सांगतील तसे वागत पण गावातील कोणत्याही राजकीय पुढार्‍याने या समाजाच्या डोक्यावर पक्के छप्पर देण्यासाठी ठोस पाऊल उचलले नाही. स्वतःच्या जोरावर त्यानी स्वतःची व समाजाची प्रगती करत सर्व कुटुंबांनी एकत्र येत आई काळूबाईचे मंदिर उभारण्याचा संकल्प केला.

अन तो पुर्ण केले . हातावर पोट असलेल्या या समाजाकडे एवढी मोठी रक्कम कुठून येणार? अशा वेळी समाजातील आकाश पवार, लखन जाधव, अमित जाधव, किरण जाधव, पिंटू जाधव आणि सिकंदर जाधव या तरुणांनी आपली हक्काची घरे संस्थेत तारण (गहाण) दिली. हे करण्यासाठी काळजाचा मोठा तुकडा लागतो. या युवकांनी ते करून दाखवले.

समाजाची व्यथा केवळ आर्थिक नाही, ती राजकीय उपेक्षेचीही आहे. चार वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री यांनी या वस्तीला भेट दिली होती. सामान्य कुटुंबात बसून भोजनाचा आस्वाद घेताना त्यांनी आश्वासन दिले होते की, "या लोकांना हक्काची घरे बांधून देऊ." परंतु, आज चार वर्षे उलटूनही त्या आश्वासनाचे रूपांतर विटा-मातीत झाले नाही. नेत्यांची वचने हवेत विरली, पण या भटक्या समाजाने आपली जिद्द हरू दिली नाही.

आपल्या पारंपारिक वाद्यांच्या सुरातून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या या गोपाळ समाजाने आज समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. 'हक्काची घरे' मिळवण्यासाठी अजूनही लढा सुरू असला, तरी 'हक्काचे मंदिर' मात्र त्यांनी आपल्या घामातून आणि हिमतीतून उभे केले आहे. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या समाजाच्या त्यागाकडे बघून किमान आतातरी दिलेली आश्वासने पाळावीत, हीच रास्त अपेक्षा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT