विशाळगड : 'पंढरपूरला जाऊया' असे सांगून कारमधून गावाबाहेरील लिंडोरी येथील एका जनावरांच्या शेडमध्ये नेऊन शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे (वय ५०) यांची गळा दाबून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह समुद्रात फेकण्याचा डाव भाच्याच्या सतर्कतेमुळे उधळल्याने प्रियकर संशयित आरोपी प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील (वय ४०, रा. शिरगाव) याला भिवंडीच्या नारपोली पोलिसांनी अटक केली.
मृत सुरेखा न्यारे आणि प्रकाश पाटील हे दोघेही एकाच गल्लीत राहत असल्याने त्यांच्यात जवळीक निर्माण होऊन प्रेमसंबंध तयार झाले होते. रविवारी सकाळी प्रकाशने सुरेखा यांना 'पंढरपूरला जाऊया' असे सांगून कारमधून गावाबाहेरील लिंडोरी येथील एका जनावरांच्या शेडमध्ये नेले. तेथे त्याने त्यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून कारने मुंबईजवळील कशेळी (जि. ठाणे) येथील समुद्रात टाकण्याचा त्याचा डाव होता. तेथे त्याने भाचा संदेश याला मदतीसाठी फोन केला; मात्र भाच्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाने पोलिसांना तत्काळ माहिती मिळाली आणि हा कट उधळला गेला.
या प्रकरणाची नोंद शाहूवाडी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली असून, पोलिसांचे पथक आरोपीस ताब्यात घेण्यासाठी भिवंडीस रवाना झाले आहे. अधिक तपासासाठी शाहूवाडी पोलिसांत हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी दिली.