वाशी : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला सद्बुद्धी दे, असे आर्जव करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली वाशी ते प्रतिपंढरपूर (नंदवाळ) अशी पायी दिंडी काढण्यात आली. यावेळी शेकडो वारकरी व शेतकऱ्यांनी नंदवाळच्या विठुरायाला महामार्ग रद्द करण्याचे साकडे घातले.
हा महामार्ग ग्रामीण भागातील सुपीक बागायती जमिनींमधून जाणार असल्याने अनेक शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच यामुळे महापुराची तीव्रता वाढून कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दिंडीदरम्यान ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’ आणि ‘एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या पायी दिंडीत महामार्गाविरोधात आक्रोश व्यक्त करण्यासोबतच दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचाही तीव्र निषेध करण्यात आला. निषेधाच्या विविध फलकांनी संपूर्ण दिंडी मार्गावर उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या पायी दिंडीत शिवसेना नेते विजय देवणे, मल्हारसेना सरसेनापती बबनराव रानगे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी साळुंखे, जीवन पाटील, अजित पवार, रघू चव्हाण, हिंदूराव चौगुले, संभाजी पाटील, दिनकर पाटील, उदय पाटील सडोलीकर, किरण पाटील, सचिन पाटील, संदीप पाटील सहभागी होते.