कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील 79 गावांतील सुमारे 2 हजार हेक्टरवरील क्षेत्रातून राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला, राज्यातील तीर्थक्षेत्रे जोडणारा पवनार ते बांदा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. या महामार्गासाठी बदललेल्या आखणीची (न्यू अलाईनमेंट) अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे 6 हजार 435 गटांतून सुमारे 120 कि.मी. लांबीचा रस्ता जाणार आहे. येत्या आठ-दहा दिवसांत भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध होईल, अशी शक्यता आहे.
कोल्हापुरातील विरोधामुळे हा महामार्ग सातारा जिल्ह्यातून वळवून पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, पन्हाळा, करवीर, राधानगरी, कागल, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यांतून सुधारित मार्गाने नेण्यात येणार आहे. या सुधारित नव्या रेखांकनाला राज्य शासनाने दि. 2 एप्रिल रोजी मान्यता दिली.
महाराष्ट्र महामार्ग अधिनियमाच्या कलम 15(2) नुसार भूसंपादनाची अधिसूचना काढण्यात येणार आहे. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती आणि मोजणी प्रक्रिया होणार आहे. ही सर्व प्रक्रिया जूनअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकांनी गुरुवारी सकाळी महामार्गातील सर्व जिल्हाधिकार्यांची आढावा बैठक घेतली.