कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील 79 गावांतून जाणार्या शक्तिपीठ महामार्गासाठी बाधितांना चौपट ते पाचपट मोबदला मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र महामार्ग कायद्यानुसारही या मार्गासाठी भूसंपादन होणार आहे. त्यातील तरतुदीनुसार जिल्ह्यात दोन हजार कोटींवर भरपाईची रक्कम मिळण्याचीही शक्यता आहे. मात्र, भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच याबाबतची नेमकी स्पष्टता होईल, असेही सांगण्यात आले.
दोन हजार कोटींवर भरपाईची रक्कम
जिल्ह्यातील सुमारे 6 हजार 435 गटातून सुमारे 120 कि.मी. लांबीचा रस्ता जाणार आहे. यामध्ये खासगी मालकीच्या 2 हजार 126 हेक्टर जागेसह एकूण 2 हजार 431 हेक्टर जागेचे संपादन केले जाणार आहे. या जागेसाठी संपादनातून मिळणारी भरपाईची रक्कम दोन हजार कोटींवर जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, भूसंपादनासाठीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच याबाबतची नेमकी रक्कम निश्चित होणार आहे.
भूसंपादन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन मागवले
या महामार्गासाठी महाराष्ट्र महामार्ग कायदा 1955 नुसार संपादन केले जाणार आहे. मात्र, जिल्ह्यात या कायद्यान्वये प्रथमच संपादनाची कार्यवाही होणार आहे. यामुळे या कायद्यातील तरतूद, येणार्या विविध अडचणी, संपादन करण्यासाठी नियुक्त अधिकार्यांच्या शंका आदींवर याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे.
गट क्रमांकाबाबतचा अहवाल मागवला
दरम्यान, प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार गट क्रमांकात काही बदल असल्यास त्याबाबतचा अहवाल संबंधित प्रांताधिकार्यांकडून मागवण्यात आला आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत संबंधित सर्व प्रांताधिकार्यांकडून अहवाल प्राप्त होताच तो राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. यानंतर भूसंपादनाबाबतची अधिसूचना काढण्यात येणार आहे.
विरोध, बदल आणि सुधारित रेखांकन; कसं आहे नवं गणित?
जुना विरोध, नवा मार्ग : 7 एप्रिल 2024 च्या मंजुरीनंतर कोल्हापुरात तीव्र विरोध झाला. 15 ऑक्टोबरला जुनी अधिसूचना रद्द झाली. शिरोळ तालुका पूर्णपणे, तर हातकणंगले-कागलमधील गावे वगळली गेली.
आता सातारामार्गे एंट्री : हायवे आता सातारा जिल्ह्यातून वळून पुन्हा सांगली-कोल्हापुरात आला आहे. 2 एप्रिल रोजी राज्य शासनाने या सुधारित रेखांकनाला मंजुरी दिली असून 5 मे रोजी नवी गावनिहाय अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.
आठ तालुके, 120 किमी लांबी : जिल्ह्यातील हातकणंगले, पन्हाळा, करवीर, राधानगरी, कागल, भुदरगड, आजरा आणि चंदगड या 8 तालुक्यांतील 79 गावांतून सुमारे 120 किमीचा रस्ता जाणार असून 2431 हेक्टर जागा संपादन होणार आहे.
महाराष्ट्र महामार्ग कायदा 1955 आणि भरपाईचे टप्पे!
संमतीने जमीन दिल्यास : जर शेतकरी स्वतःहून जमीन देत असतील, तर त्यांना जमिनीच्या बाजारभावाच्या (रेडीरेकनरच्या) 5 पट मोबदला मिळतो.
मोबदल्याचे दोन पर्याय : शेतकर्यांनी संमतीने जमीन दिल्यास रेडीरेकनरच्या 5 पट मोबदला मिळेल, तर सक्तीने संपादन झाल्यास 4 पट मोबदला दिला जाईल
तीन टप्प्यांत पैशांचे वाटप : भरपाईची रक्कम एकदम न मिळता तीन टप्प्यांत विभागली जाईल. सुरुवातीला 50 टक्के, कराराच्या वेळी 25 टक्के आणि उर्वरित 25 टक्के रक्कम 6 महिन्यांनंतर दिली जाईल. विहिरी, झाडे आणि उभ्या पिकांची भरपाई स्वतंत्र असेल.
या गावातून जाणार महामार्ग
हातकणंगले : पारगाव पन्हाळा : बहिरेवाडी, जाखले, गिरोली, पोहाळे तर्फ आळते, कुशिरे तर्फ ठाणे करवीर : केर्ली, केर्ले, वरणगे, पाडळी बुद्रुक, शिंदेवाडी, खुपीरे, वाकरे, कुडित्रे, बहिरेश्वर, कसबा बीड, गणेशवाडी, शिरोली दुमाला, सडोली दुमाला, हिरवडे दुमाला, भाटणवाडी, सोनाळी, हसूर दुमाला.
राधानगरी : राशिवडे बुद्रुक, कोदवडे, वाघवडे, मोहडे, चाफोडी तर्फ तारळे, कौलव, पिंपळवाडी, ठिकपुर्ली, कुर्हाडवाडी, माजगाव, तळाशी, तुरंबे, कपिलेश्ववर, मालवे, कागल-बोरवडे, उंदरवाडी. भुदरगड : नाधवडे, कोनवडे, निळपण, दारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डे, पुष्पनगर, सोनारवाडी, मडूर, करडवाडी, शेळोली, पडखंबे, सोनुर्ली, मेघोली, बेडीव, आरळगुंडी.
आजरा : कोरीवडे, हरपवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवट्टी, पेठेवाडी, आजरा, मसोली, कर्पेवाडी खालसा, खानापूर, पोळगाव, एरंडोळ, सातेवाडी. चंदगड : गवसे, बुझवडे, कुरणी, इनाम म्हाळुंगे, बिजूर, कानूर बुद्रुक, भोगोली, पिळणी, जांबरे, इसापूर.