कोल्हापूर : कोल्हापूरची अस्मिता असलेली शाहू मिल शासनानेच सुरू करून तिथे राजर्षी शाहू महाराजांचे स्मारकही उभे राहिले पाहिजे, ही कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे. हा लढा तीव्र करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेणार आहे. त्यानंतर विशेष समिती स्थापन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शाहू मिलची माहिती पटवून देऊ, अशी भूमिका खा. शाहू महाराज यांनी घेतली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज मिल संवर्धन समिती पदाधिकार्यांची बैठक सोमवारी न्यू पॅलेस येथे पार पडली. शाहू मिल संवर्धन समितीतर्फे या लढ्याचे नेतृत्व खासदार शाहू महाराज यांनीच करावे, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
खा. शाहू महाराज म्हणाले, शाहू मिलप्रश्नी जिल्ह्यातील खासदार, आमदार, महापौर व लोकप्रतिनिधींची लवकरच व्यापक बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली जातील. जोपर्यंत शाहू मिल पुन्हा सुरू होत नाही, तोपर्यंत हा जनरेटा सुरूच राहील. शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय देवणे म्हणाले, शाहू मिलच्या लढ्याचे नेतृत्व शाहू महाराज यांनी करावे. त्यामुळे आंदोलनाला ताकद मिळेल. अॅड. बाबा इंदुलकर म्हणाले, कोल्हापूरची ओळख राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे आहे. त्यामुळे मिल सुरू होणे काळाची गरज आहे. माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, संवर्धन समितीचे अध्यक्षपद शाहू महाराजांनी स्वीकारावे. यावेळी संभाजीराव जगदाळे, शिवाजीराव परूळेकर, रवी जाधव, चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कॉ. दिलीप पोवार, माजी नगरसेवक अनिल कदम, कॉ. सतीशचंद्र कांबळे, ‘आप’चे संदीप देसाई, दगडू भास्कर, काका पाटील, शेखर कवाळे, फिरोज पठाण, मनसेचे राजू जाधव, शुभम शिरहट्टी, दिलीप पाटील, अनिकेत दिंडे यांनी सूचना मांडल्या. नगरसेवक संजय मोहिते, क्रिडाईचे अध्यक्ष के. पी. खोत, बाबा पार्टे, शंकर कवाळे, रोहित कवाळे, डॉ. रवींद्र मोरे, रूपाली कवाळे, कॉ. रघुनाथ कांबळे,अनिल कवाळे, सनी कवाळे, विनायक देवकुळे, पप्पू पांढरे, गणेश बुचडे, अमरसिंह निंबाळकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.