कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेने काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून दिले असून, सभागृहात जनतेच्या प्रश्नांसाठी ताकद दाखवा तसेच सत्ताधार्यांनी मनमानी निर्णय घेऊ नयेत, यासाठी सक्षम विरोधकाची भूमिका आपण सभागृहात पार पाडावी, असे आवाहन विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक शुक्रवारी अजिंक्यतारा कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार पाटील बोलत होते.
महापौर निवडीसाठी काँग्रेसला बिनविरोध प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, जनतेने काँग्रेसला सर्वाधिक जागा देत मोठा पक्ष म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेत सभागृहात आपलं अस्तित्व ठामपणे मांडणं गरजेचं आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी विरोधक म्हणून एकत्रितपणे संघर्ष करा, सभागृहात पार्टी स्पिरीट दाखवा आणि सकारात्मक भूमिका घ्या, अशा सूचनाही पाटील यांनी यावेळी दिल्या. निधी फक्त सत्ताधारी नगरसेवकांनाच मिळू शकत नाही. काँग्रेसकडे मोठे संख्याबळ असल्यामुळे सत्ताधार्यांना आपली दखल घ्यावीच लागेल, संसदेत विरोधकांची संख्या सुमारे दोनशे असून, एकजूट असल्यामुळे पंतप्रधान अनेकदा संसदेत यायला टाळतात. हीच भूमिका महापालिकेतही काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोधक म्हणून घ्यावी, असे पाटील यांनी सांगितले.
बैठकीस आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख सुनील मोदी, बाळासाहेब सरनाईक, सरलाताई पाटील, गटनेते नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, राजू लाटकर, संजय मोहिते, प्रवीण केसरकर यांच्यासह काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.