कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) आणि जिल्हा बँक या शेतकर्यांच्या तारणहार संस्था आहेत. त्यामुळे विधानसभेच्या राजकारणातून या संस्थांची बदनामी करू नका, असा सल्ला आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांना दिला. महापालिकेत पत्रकारांशी ते बोलत होते.
एखादे प्रकरण पुढे आणण्यासाठी भाजपचे तारणहार किरीट सोमय्या आहेत, असे सांगून आमदार पाटील म्हणाले, तीन-चार दिवसांत सोमय्या कोल्हापुरात येऊन चौकशीची मागणी करतील. भाजपची ही ठरलेली कार्यपद्धती आहे. गोकुळचे अध्यक्ष महायुतीचे आहेत. त्यांनी आता काय ते बघून घ्यावे. गोकुळची ईडी चौकशी करू शकेल, अशी माहिती आमदार शिवाजी पाटील यांच्याकडे आहे का? गोकुळमधील प्रत्येक ठरावावर विरोधी संचालकांच्याही सह्या आहेत. असे असताना आता अनभिज्ञ असल्याचे ते सांगू शकत नाहीत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
भोंदूबाबा खरात प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करत आमदार पाटील म्हणाले, एसआयटी चौकशी सखोल होणार का? खरातशी व्यवहारिक लांगेबांधे असणार्यांना अभय मिळणार का? खरातसारखी प्रवृत्ती निर्माण होऊ नये, यासाठी लवकर कारवाई झाली पाहिजे. ज्यांच्यावर आरोप आहेत त्या मंत्री दीपक केसरकर, रूपाली चाकणकर यांनी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट करावी. संबंध असतील तर ते मान्य करावेत. बँक खात्यात पैसे व्यवहाराचे पुरावे दिसत असताना आणखी काय पुरावा हवा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शक्तिपीठ महामार्गाबाबत गावोगावी मेळावा घेणार
शक्तिपीठ महामार्गाबाबत बोलताना पाटील म्हणाले, रेखांकन बदलून करवीर, पन्हाळा, हातकणंगले या शेतीसमृद्ध तालुक्यातील वारणा, भोगावती, पंचगंगा, कुंभी या महापूर येणार्या नदी पट्ट्यातून रेखांकन जाणार आहे. गरज नसलेला शक्तिपीठ मार्ग रद्द करावा. अद्याप गट क्रमांक जाहीर झाले नसून ते जाहीर झाल्यानंतर गावोगावी मेळावे घेऊन भूमिका स्पष्ट केली जाईल.