कोल्हापूर : पक्षविरहित असलेल्या गोकुळमध्ये आम्ही चोख कारभार केला. पण महायुतीने गोकुळला पक्षीय झालर लावली आहे. तरीही त्यांच्यात अंतर्गत कलह दिसत असून ‘मुश्रीफांची गोकुळमधील हतबलता नेमकी का आहे?’ असा प्रश्न विधान परिषदेतील काँग््रेासचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. ते सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
पाटील म्हणाले, जिल्ह्यातील सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून गोकुळचा कारभार पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने चालवण्यात आला. ही संस्था कायम पक्षविरहित ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र महायुतीने गोकुळला पक्षीय रंग दिल्याने सध्या संस्थेमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला आहे. आ. शिवाजी पाटील यांनी केलेल्या आरोपांबाबत ते म्हणाले की, गोकुळला बदनाम करू नये, अशी विनंती आपण त्यांना करणार आहोत. महायुतीतील अंतर्गत मतभेदांमुळेच गोकुळ निवडणूक पुढे ढकलली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
केवळ सत्तेत राहण्यासाठीच शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग््रेास यांची धडपड सुरू आहे, असे आ. पाटील म्हणाले. साताऱ्यातील घडामोडींचा दाखला देत, मंत्र्यांच्या हातातूनच जिल्हा परिषद सदस्य खेचले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत महायुतीतील विसंवाद स्पष्ट झाल्याचेही त्यांनी नमूद केले.