कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये राजकीय टक्कर देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे केले. रेड्याची टक्कर स्मृती शिल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 31 लाख रुपये खर्चून बनविलेले हे शिल्प अतिशय भव्य असे झाले असून ते पर्यंटकासाठी आकर्षण ठरणार आहे. माजी आ. ऋतुराज पाटील, जयश्री जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
आ. पाटील म्हणाले, पूर्वी येथे असणार्या माळावर रेड्याची टक्कर व्हायची, यापूर्वी विलास पाटील नगरसेवक असताना त्यांनी येथे एक शिल्प उभारले होते; पण काळाच्या ओघात ते रस्त्याच्या बाजूला पडत गेले. येथे भव्य शिल्प असावे, ही काकासाहेब पाटील यांची कल्पना होती. त्यांनी हे काम पूर्ण केले. कोल्हापूर हे पुतळ्यांचे शहर आहे. महापुरुषांच्या विचारांचे स्मरण यानिमित्ताने होते. येथे कायमस्वरूपी आकर्षक विद्युत व्यवस्था व सीसीटीव्ही बसविण्यासाठी आणखी 5 लाख रुपये तर काकासाहेब पाटील यांनी संकल्प सोडलेल्या शाहूनगर येथील शाहू स्मारकासाठी 20 लाखांचा निधी देऊ.
माजी आ. ऋतुराज पाटील यांनी देखील या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. माजी आ. जयश्री जाधव यांनी कै. चंद्रकांत जाधव यांची हे काम करण्याची इच्छा यानिमित्ताने पूर्ण झाल्याचे सांगितले. कार्यक्रमास राजेश लाटकर, भूपाल शेटे, शिवाजी कवाळे, प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, दुर्गेश लिंग्रस, सुरेश ढोणुक्षे, काकासाहेब पाटील, उमेश पोवार, राजू साबळे, विनायक फाळके आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल घाटगे यांनी केले. यावेळी गवळी समाजातील प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. रेड्यांची स्पर्धा देखील घेण्यात आली.
शिल्प उभारणी केलेल्या अभियंता तेजस माने यांनी हे काम टिकाऊ असल्याचे सांगत माझ्या नातवापर्यंत हे काम टिकेल, असा दावा केला. यावर आ. सतेज पाटील यांनी ललित डोंगरसाने व तेजसने दर्जात्मक काम केल्याचे सांगितले.