प्रवीण मस्के
कोल्हापूर : केंद्र शासनाकडून कोणताही स्पष्ट निर्णय न झाल्याने समग्र शिक्षा अभियान सध्या ठप्प झाले आहे. मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजना अडचणीत आल्याने शैक्षणिक क्षेत्रात संभ—माचे वातावरण आहे. योजना बंदचा थेट फटका जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
समग्र शिक्षा अभियान केंद्र सरकारने 2002 मध्ये सुरू केले. समग्र शिक्षाअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश देण्यासह शाळांची गुणवत्ता वाढवणे, शिक्षक प्रशिक्षण, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना राबवणे, शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षण प्रवाहात आणणे अशा अनेक महत्त्वाच्या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाते. गेली अनेक वर्षे हे अभियान प्रभावीपणे सुरू होते; परंतु अभियानाची 31 मार्च रोजी मुदत संपली आहे.
अभियान ठप्प झाल्याने या सर्व शैक्षणिक कामांवर परिणाम झाला आहे. 2 एप्रिलपर्यंत शासनाकडून निर्णय अपेक्षित असतानाही कोणतीही स्पष्टता न आल्याने विद्यार्थ्यांच्या योजनांवर संकट ओढावले आहे. आगामी शैक्षणिक वर्षाच्या तयारीवरही परिणाम होत आहे. राज्य शासनाने अभियान सुरू करून कर्मचार्यांची तत्काळ नियुक्ती न केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (पूर्वार्ध)
...तर हजारो मुले शिक्षण प्रवाहाबाहेर
यावर्षी मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वितरणात विलंब झाल्यास जिल्ह्यातील सुमारे 1 लाखांहून अधिक व महापालिका शाळेत 11 हजार लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणे अवघड असून लाखो विद्यार्थी वंचित राहण्याची भीती आहे. तसेच शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध व पटसंख्या वाढवा अभियान बंद झाल्यास हजारो मुले शिक्षण प्रवाहाबाहेर जाण्याची शक्यता आहे.