कोल्हापूर : मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व भाषा विकास संशोधन संस्था आणि शिवाजी विद्यापीठांतर्गत संत तुकाराम अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 30 डिसेंबर रोजी राजर्षी शाहू सिनेट सभागृहात ‘संत साहित्य संमेलन 2025’चे आयोजन केले आहे.
ग्रंथदिंडीने संमेलनास सुरुवात होणार आहे. सकाळी 9 वाजता प्रभारी कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते पालखी पूजन होईल. याप्रसंगी पारंपरिक वारकरी भजन, लेझीम आणि झिम्मा फुगडी कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. सतीश बडके संमेलनाध्यक्ष असतील. प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी हे सत्राध्यक्ष असणार आहेत.
याप्रसंगी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, प्रा. प्रवीण बांदेकर, शिवाजी विद्यापीठ मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दुपारी 12 ते 2 यावेळेत ‘वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. दुपारी 3 वाजता ‘वारी एक आनंदयात्रा’ या विषयावर ज्येष्ठ छायाचित्रकार आणि वारी अभ्यासक संदेश भंडारे यांचा मुलाखत कार्यक्रम होईल. दुपारी 4 वाजता श्री दत्त भजनी मंडळ, शिपूर, ता. मिरज (जि. सांगली) यांचा कबीरपंथी भजन कार्यक्रम होणार आहे.
विद्यापीठाच्या संगीत आणि नाटयशास्त्र विभागाच्या अभंगवाणी कार्यक्रमाने सायंकाळी 5 वाजता संमेलनाचा समारोप होईल. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन भाषाविकास संस्थेचे अध्यक्ष रणधीर सुतार, संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले आहे.