आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी शासकीय विश्रामगृहावरील एक कक्ष आरक्षित राहणार आहे. 
कोल्हापूर

आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी सुरक्षागृह

शासकीय विश्रामगृहातील एक कक्ष आरक्षित राहणार : राज्य शासनाचे आदेश

पुढारी वृत्तसेवा
अनिल देशमुख

कोल्हापूर : आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी शासकीय विश्रामगृहावरील एक कक्ष आरक्षित राहणार आहे. असा विवाह केलेल्या जोडप्यांना सुरक्षा देण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षागृहाची व्यवस्था केली जाणार आहे. हे सुरक्षागृह शासकीय विश्रामगृहात उपलब्ध करून दिले जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणार्‍या जोडप्यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत 13 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढण्यात आले होते. त्यात आज शासनाने सुधारणा केली आहे. या सुधारित परिपत्रकानुसार अशा जोडप्यांना सुरक्षा देण्याबाबत करण्यात येणार्‍या उपाय योजना स्पष्ट केल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. या कक्षाचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, त्या कक्षातील सदस्यांची नावे ही सर्व अद्ययावत माहिती जिल्हानिहाय पोलिस महासंचालक तसेच संबंधित जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच पोलिस आयुक्त यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा जोडप्याला काही काळासाठी सुरक्षित राहण्याची व्यवस्था व्हावी याकरिता आता सुरक्षागृहे उभारण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. याकरिता प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी एक कक्ष आरक्षित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही कारणास्तव या ठिकाणी कक्ष उपलब्ध न झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या अथवा तालुक्याच्या ठिकाणी रिक्त शासकीय निवासस्थान याकरिता दिले जाणार आहेत.

ज्या ठिकाणी हे सुरक्षागृह असेल त्या शासकीय विश्रामगृहांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक याची अद्ययावत माहिती संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व सामाजिक न्याय, विशेष सहाय्य विभाग यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेही बंधनकारक केले आहे.

जोडप्यांना सुरक्षित आधार

अजूनही अनेक ठिकाणी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाला विरोध होतो. त्यातून वादाचे, हाणामारीचेही प्रसंग उद्भवतात.अशा जोडप्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतो. त्यातून अनेक जोडप्यांची भटकंती सुरू होते. त्यातून अन्य गंभीर प्रकारही घडतात. या सर्व पार्श्वभूमीवर विवाह झाल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत अथवा निवासाची व्यवस्था होईपर्यंत अशा जोडप्यांना सुरक्षा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT