कोल्हापूर : अडीच वर्षांत महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांनी सरकारच्या सर्व योजना विविध घटकांपर्यंत पोहोचविल्या आहेत. त्यामुळे अमल महाडिक यांच्यासारख्या चांगल्या नेतृत्वाची दक्षिणेत गरज आहे. अमल महाडिक विविध योजनांतील अनेक कामे नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते आ. सदाभाऊ खोत यांनी केले. कळंबा येथे महायुती पुरस्कृत भाजप, शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी, रिपाइं महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
सदाभाऊ खोत म्हणाले, गेली दहा वर्षे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात अमल महाडिक यांनी खासदार फंड असेल अथवा भाजपच्या माध्यमातून, सर्व कौशल्ये पणाला लावून प्रचंड कामे केली आहेत आणि विशेष म्हणजे ते सहज कोणालाही कधीही उपलब्ध असतात. ते अनेकांना आपले घरचे वाटतात म्हणूनच त्यांना पुन्हा एकदा आमदारकी द्यायची, असेच आता मतदारांनीच ठरवले आहे. या सभेला डॉक्टर सिद्धार्थ घोडेस्वार, संजय वास्कर, भिकाजी गाडगीळ, छाया मधुकर भवड, स्वरूप पाटील, उज्ज्वला पाटोळे, बाजीराव पोवार, संभाजी पोवार (बावडेकर), सचिन कदम, प्रकाश पडळकर, महादेवराव खानविलकर, संदीप जाधव, प्रकाश कदम, सविता कांबळे, नामदेव पोवार, तानाजी पाटील, दिलीप पाटील, सचिन मगोरे तसेच संस्था, संघटनेचे पदाधिकारी, तालीम संस्था, तरुण मंडळे उपस्थित होते. निवडणूक काळातील ही सर्वात मोठी सभा असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.
डिजिटल बोर्ड लावून कामे केल्याचा अवास्तव दावा करण्यापेक्षा गेली दहा वर्षे आपण सातत्याने दक्षिणच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी कार्यरत आहोत. त्यामुळे सुज्ञ मतदार पुन्हा एकदा मला आमदारकीची जबाबदारी नक्कीच देतील, असा विश्वास उमेदवार अमल महाडिक यांनी व्यक्त केला .