कोल्हापूर : नगरसेवक राजेश लाटकर धुतल्या तांदळाचे नाहीत. कावळा नाका येथील जागेत गाळा मिळावा, यासाठी ते कोणाच्या हात धुवून मागे लागले होते, हेही जनतेसमोर जाहीर करावे, असे खुले आव्हान नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी केले.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विकासकामांचा वाढता आलेख पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभूत करता आले नाही, महापालिकेतील सत्ता गेल्याने विरोधक वैफल्यग्रस्त झाले आहेत. याचाच प्रत्यय काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आला. वास्तविक महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मधुरिमाराजे यांच्या विरोधात बंडखोरी केली की नाही? राजे घराण्यासोबत गद्दारी केली की नाही? काँग्रेसच्याच उमेदवाराविरोधात फॉर्म भरला की नाही? त्यासाठी कुणाकडून किती पैसे घेतले? विधानसभेची निवडणूक ते कुणाच्या जीवावर लढले, हे आधी जाहीर करावे आणि मगच त्यांनी आ. क्षीरसागर यांच्यावर टीका करावी, असा पलटवार नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
जयप्रभा स्टुडिओची जागा खासगी मालकीची आहे; पण जनभावना आणि कलाकारांच्या भावनांचा आदर ठेवून ही जागा शासनाकडे हस्तांतरित करण्यासाठी आ. क्षीरसागर प्रयत्नशील आहेत. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळीतग्रस्त झाल्यानंतर तत्काळ आ. क्षीरसागर यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी पाचारण केले आणि २५ कोटी निधी मंजूर करून घेतला.