कोल्हापूर : शाळा आणि महाविद्यालय सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी विशेष गस्त घाला, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सोमवारी दिल्या. पोलिस अधीक्षक कार्यालयात महिला तक्रारदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. यावेळी महिलांच्या तक्रारीवर ठोस कारवाई करा, अशा सूचनाही त्यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या.
चाकणकर म्हणाल्या, महिलांवरील अत्याचार प्रकरणात प्राधान्याने तक्रार दाखल करून घ्या. ही तुमची जबाबदारी आहे. तपासाची प्रक्रिया त्यानंतर सुरू होते. मात्र या काळात अत्याचारग्रस्त महिलेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून संबंधित आरोपीवर योग्य ती कारवाई व्हावी, यासाठी ठोस पावले उचला. शाळा, महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी विशेष गस्त ठेवा मात्र, हा उपाय केवळ मुलींच्या सुरक्षेसाठी नसून तरुण मुलांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवण्याचा उद्देश ठेवून करावा, त्याकरिता तरुणांत जनजागृती आणि प्रबोधन करा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यात महिलांसह तृतीयपंथीयांसाठी जनजागृती मोहीम राबवा. हिरकणी कक्ष कार्यरत असल्याची खात्री करून घ्या, विधवा प्रथा आणि बाल विवाहविरोधी ठराव ग्रामसभेच्या माध्यमातून मंजूर करून घ्या आदी सूचनाही त्यांनी केल्या.
पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी महिलांसाठी राबवण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, महिला लोकशाही दिन, भरोसा सेल, निर्भया पथक, महिला हेल्पलाईन आदींची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी पोलिस उपाधीक्षक सुवर्णा पत्की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, निर्भया पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक स्वाती यादव यांच्यासह संबंधित इतर विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
अत्याचार प्रकरणात आरोपी वारंवार न्यायालयात गैरहजर राहात असेल तर वॉरंट प्रक्रिया त्वरित राबवा. काही आरोपी बिनधास्त वावरताना दिसतात. हे पीडित महिलांसाठी मानसिक त्रासदायक ठरते. त्यामुळे अशा आरोपींना कायद्याची कठोर जाणीव करून द्या, असेही चाकणकर म्हणाल्या.