कोल्हापूर : युगपुरुषांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्ये करणार्या प्रवृत्तीचा प्रतिकार केला नाही तर ते घाव वाढत जातील जे समाजासाठी घातक ठरतील. त्यामुळे युगपुरुषांबद्दल बरळणार्यांना कायद्याची वेसण हवी, असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी केले. पुरोगामी विचार संघटनांतर्फे छत्रपती शिवाजी महाराज सन्मान परिषदेत ते बोलत होते.
शाहू स्मारक भवन मिनी सभागृहात सोमवारी झालेल्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी कॉ. गिरीश फोंडे होते. अभिनेते किरण माने यांनीही संवाद साधला.आ. पवार म्हणाले, समाजात जिथे जिथे अन्याय होत असेल त्यांच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. समाजातील वैचारीक विकृती वाढली तर सामान्यांचे जगणे अवघड होईल. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकात खरे शिवचरित्र मांडले आहे. मराठी भाषेच्या व्युत्पत्ती कोषात नावापुढे जी हा प्रत्यय आदरार्थीच आहे. मात्र सवर्ण समाजाने हा उल्लेख जाणीवपूर्वक काढला त्यावर मात्र कुणी भाष्य करत नाही.
अभिनेते किरण माने म्हणाले, बहुजन विरुद्ध ब्राह्मण्यवाद विकृतीने फणा काढला असताना आता मागे राहून चालणार नाही. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या शत्रूतील याच ब्राह्मण्यवादाला थारा दिला नव्हता. आता तीच भूमिका घेतली पाहिजे.प्रशांत आंबी म्हणाले, येत्या काळात न्यायासाठी हायकोर्टापर्यंत जाणार. चळवळीत तयार झालेले विचारच गायकवाडसारख्यांचा माज उतरवतील.
कॉ. रघुनाथ कांबळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्ही. बी. पाटील, आरती रेडेकर, स्मिता पानसरे, वसंतराव मुळीक, रुपेश पाटील उपस्थित होते.
परिषदेतील ठराव
पुरोगामी विचारांच्या सन्मान व संरक्षणासाठी कायदा करावा
इतिहासाची मोडतोड करुन राजकीय वापर करणार्यांचा निषेध
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मान रक्षणासाठी कायदेशीर जनआंदोलन उभारणार
महापुरुषांचे विचार लाखो पुस्तकांद्वारे घराघरात पोहोचवणे