सतीश सरीकर
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील जल वाहिन्यांमधील पाणी गळती अचूकपणे शोधण्यासाठी महापालिका तब्बल 50 लाख रुपये खर्चून दोन विशेष रोबो खरेदी करणार आहे. या रोबोला भूमिगत पाईपलाईनमध्ये उतरवून गळतीची ठिकाणे शोधली जाणार आहेत. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यास मदत होणार आहे. दिवसेंदिवस तीव— होत असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
60 ते 70 टक्के पाणी वाया...
कोल्हापूर शहरात 3 इंच ते 10 इंच व्यासाच्या सुमारे एक हजार 100 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या आहेत. महापालिकेकडून दररोज सुमारे 200 एम.एल.डी. पाणीपुरवठा केला जातो. संपूर्ण शहरात आणि गावठाणात पाणीपुरवठ्याचे जाळे विस्तारलेले आहे. मात्र जुन्या आणि गंजलेल्या जलवाहिन्या, फुटलेल्या पाईपलाईन, अनधिकृत जोडण्या आणि देखभालीअभावी तब्बल 30 ते 35 टक्के पाणी गळतीतून वाया जाते. म्हणजेच दररोज जवळपास 60 ते 70 एमएलडी पाणी नागरिकांपर्यंत पोहोचण्याआधीच गळतीतून नष्ट होत आहे.
रोबो यशस्वी झाल्यास दिलासा...
महापालिकेकडून शहरातील प्रमुख जलवाहिन्यांचे सर्वेक्षण टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. प्रथम जास्त गळती असलेल्या भागांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण शहरातील पाईपलाईनची तपासणी होणार आहे. या मोहिमेमुळे लाखो लिटर पाणी वाचण्याबरोबरच पाणीपुरवठा व्यवस्थेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे. महापालिकेचे हे ‘रोबो मिशन’ यशस्वी ठरल्यास कोल्हापूरच्या पाणीप्रश्नाला मोठा दिलासा मिळू शकतो.
सूक्ष्म गळतीही ओळखणार...
महापालिकेने आधुनिक ‘लीकेज डिटेक्शन रोबो’ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे रोबो थेट जलवाहिनीत सोडले जाणार असून ते पाईपलाईनमधून फिरत गळतीची ठिकाणे शोधणार आहेत.