अनिल देशमुख
कोल्हापूर : शहरातील विकासकामांना आता गती येणार आहे. राज्य शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी देण्यात येणार संपूर्ण शंभर टक्के निधी आता राज्य शासनच देणार आहे. यामुळे आपल्या वाट्याच्या हिस्स्याची नेहमीची महापालिका, नगरपालिकांची चिंता आता मिटणार आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने गुरुवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
महापालिका, नगरपालिकांना नगरविकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी निधी दिला जातो. हा निधी देताना राज्य शासन आणि महापालिका, नगरपालिका यांचा वर्गवारीनुसार हिस्सा निश्चित केला होता. त्यामुळे या योजनेंतर्गत मिळालेल्या निधीतून काम करताना राज्य शासनाकडून निधी येतो; मात्र आपल्या हिस्स्याचा निधी देताना महापालिका, नगरपालिकांना कसरत करावी लागत होती. आता मात्र ही हिस्स्याची अटच काढून टाकण्यात आली. या कामांसाठी आता राज्य शासनच संपूर्ण निधी देणार आहे.
प्रकल्प रखडण्याचा धोका नाही
वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी मोठ्या प्रमाणात प्रकल्पांना निधी दिला जात होता. त्यातून राज्य शासनाच्या हिस्स्याच्या रकमेचे काम गतीने पूर्ण होत होते. मात्र, अनेक मनपा, नपाना त्यांच्या हिस्स्याची रक्कम भरणे अनेकदा कठीण होत होते. त्यामुळे प्रकल्प रखडण्याचा मोठा धोका होता. अनेक ठिकाणी प्रकल्पाच्या खर्चात वाढ होऊन, काही ठिकाणी मनपा, नपाचा निधी न आल्याने प्रकल्प वेळेत पूर्ण झाले नाहीत. काही प्रकल्प अर्धवट राहिल्याचे चित्र आहे. आता हा धोका राहणार नाही.