कोल्हापूर : तीन महिन्यांचे रेशनचे धान्य एकदम द्या, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे; मात्र तीन महिन्यांचे हे धान्य द्यायचे तरी कसे, असा प्रश्न प्रशासन आणि दुकानदारांपुढे पडला आहे.
ई-पॉस मशिनमधील तांत्रिक दोष दूर करून त्याचे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यात आले. यामुळे एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य रेशन कार्डधारकांना एकदमच द्या, असा आदेश पुरवठा विभागाने काढला आहे. या आदेशामुळे प्रशासन आणि रेशन धान्य दुकानदार यांची धान्य वितरणाबद्दल चांगलीच अडचण आली आहे. प्रत्येक पुढील महिन्याचा धान्यसाठा चालू महिन्याच्या अखेरीस येतो. त्यानंतर तो त्या महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात वाटप केला जातो. एप्रिलच्या धान्याचे वाटप संपत आले आहे. मे महिन्याचे धान्य अद्याप आलेले नाही. त्यामुळे तीन महिन्यांचे धान्य द्यायचे कसे, असा प्रश्न आहे.
33 टक्के ग्राहकांना जून पर्यंत प्रतीक्षा
तीन महिन्यांचे एकत्रित धान्य शासनाकडून प्रशासनाला दिले जात नाही. दर महिन्याला मिळणार्या धान्यातून दरमहा 33 टक्के ग्राहकांना तीन महिन्यांचे धान्य देण्याच्या सूचना आहेत. यामुळे एप्रिलमध्ये 33 टक्के ग्राहकांना जूनपर्यंत, मेमध्ये 33 टक्के ग्राहकांना एप्रिल, मे आणि जूनचे धान्य मिळेल, तर जून मध्ये उर्वरित 33 टक्के ग्राहकांना एप्रिलपासूनचे धान्य मिळेल. या तत्त्वाने अखेरीस धान्य मिळणार्या कार्डधारकांना तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
प्रशासनाच्या अडचणी
* तीन महिन्यांचे धान्य हाताळण्यास पुरेश मनुष्यबळ नाही
* धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी तितक्या क्षमतेची गोदामे नाहीत.
* महिन्याला 33 टक्के लोकांनाच धान्य द्यावे लागणार
दुकानदारांच्या अडचणी
* तीन महिन्यांचे धान्य ठेवण्यासाठी जागाच नाही
* महिन्यात तीस टक्के लोकांनाच धान्य, त्याचा क्रम ठरवणार कोण?
* धान्य देण्यावरून ग्राहकाकडून होणार्या वादाची भीती