नृसिंहवाडी : "मुंबईत ठाकरे बंधूंनी सत्याचा मोर्चा काढला आहे. मात्र या मोर्चात काँग्रेसचे काही नेते सहभागी झाले नाहीत. अशा मोर्चाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चित योग्य उत्तर देतील." असे महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनानिमित्त आले होते.
येथील दत्त मंदिरात दर्शन घेतल्यानंतर श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देवस्थानतर्फे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी सभापती राम शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी मंदिर परिसराची व विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. राज्यातील जनतेला व शेतकऱ्यांना सुख समृद्धी लाभू दे, अशी दत्तचरणी प्रार्थना केली असल्याचे ते म्हणाले. मुंबईतील 'सत्याचा मोर्चा' व ऊस उत्पादकांच्या प्रश्नाबाबत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. यावेळी नृसिंहवाडीचे माजी उपसरपंच अभिजित जगदाळे, माजी नगराध्यक्ष मनिषा डांगे, प्रांताधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, सतीश मलमे, मुकुंद पुजारी, युवराज जगदाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान इच्छुकांची मागे-पुढे लगबग दिसून आली. महायुतीकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्यालाच संधी मिळावी यासाठी नेते धडपडताना दिसले. येत्या काळात आपल्यावर लक्ष राहुदे अशी अपेक्षा परिसरातील नेत्यांनी शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. यावर शिंदे यांनी स्मितहास्य करत इच्छुकांना एकप्रकारे शुभेच्छा दिल्या.