कोल्हापूर : माजी खा. राजू शेट्टी यांच्याकडे आता कसलेही पद नाही. शेतकरी बांधवांना फसवून त्यांनी कारखानदारांशी युती केली आहे. त्यामुळेच त्यांना पैशाच्या गोष्टी दिसत आहेत. शेतकर्यांनीही त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. विकासाला विरोध करून शेतकर्यांची दिशाभूल करण्याचे काम शेट्टी यांनी बंद करावे. त्यांच्या अशा दिखाऊपणामुळेच शेतकरी त्यांच्या पाठीशी राहिले नाहीत. याचे आत्मचिंतन त्यांनी करावे, असा सल्ला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे दिला.
महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र दिसत असून, ‘खोटे बोल; पण रेटून बोल’ हीच त्यांची प्रवृत्ती राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवली. येणार्या काळातही महाविकास आघाडीला जनता त्यांची जागा नक्कीच दाखवून देईल. दरम्यान, शेट्टी यांनी केलेल्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही. 2019 च्या निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने माझी बदनामी करण्यासाठी हे आरोप केले गेले; पण हे आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले असून, हे आरोप राजू शेट्टी यांनी सिद्ध करावेत; अन्यथा त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्यात येईल, असेही आ. क्षीरसागर यांनी पत्रकात म्हटले आहे.
शक्तिपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्याच्या व राज्याच्या उन्नतीसाठीच आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी माझा खटाटोप सुरू आहे. मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत शक्तिपीठ महामार्ग समर्थन समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शेट्टी यांच्या मतदारसंघातील शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतून 75 टक्के शेतकर्यांनी समर्थन दिले असून, उर्वरित शेतकरीही लवकरच समर्थन देतील, असेही आ. राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.