कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
शहरासह जिल्ह्यात पावसाची पुन्हा रिपरिप सुरू झाली आहे. शहरात मंगळवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली, दुपारी काही काळासाठी मोठ्या सरी कोसळल्या.
यामुळे शहरातील सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. गेल्या २४ तासांत कुंभी धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली असून, जिल्ह्यात सर्वाधिक ३९.२ मि.मी. पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला. हवामान विभागाच्या अहवालानुसार, शनिवार (दि. ७) पर्यंत ढगाळ वातावरण व मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
शहरात सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत होत्या. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती, यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आल्याने आरास, फुले, सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी गेल्या चार दिवसांपासून मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे.
मात्र, मंगळवारी पावसामुळे नागरिकांचे हाल होत होते. छत्री, टोपी, रेनकोट घालून खरेदीसाठी नागरिक येत होते. दिवसभर पावसाची रिपरिप व अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या मोठ्या सरी, यामुळे शहरातील सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे शहरातील प्रमुख चौकांत अक्षरशः डबकी तयार झाली होती.
राधानगरी धरणातून २ हजार ९२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ८.१ मि.मी. पाऊस झाला. पंचगंगा नदीची पाणी पातळी १६.६ फुटांवर असून, जिल्ह्यातील १८ बंधारे पाण्याखाली आहेत.