Radhanagari Pimpalwadi Jalabhishek Ritual For Rain
कौलव : जून महिन्याचा अर्धा कालावधी उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. शेतीसह जनजीवनावर पावसाचे संकट गडद होत असताना राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडी येथील ग्रामस्थांनी पारंपरिक श्रद्धा आणि संस्कृती जपत गावातील तसेच पंचक्रोशीतील देवदेवतांना साकडे घातले. ग्रामस्थांनी बैलगाडी मिरवणूक काढत पवित्र गंगबावीतील पाणी आणून विविध देवस्थानांमध्ये जलाभिषेक करून वरुणराजाला साद घातली.
डोंगरमाथ्यावर वसलेल्या पिंपळवाडी गावाचे संपूर्ण जनजीवन पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. शेती हा येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय असून बहुतांश शेतकरी भातशेती करतात. यंदा मान्सून वेळेत दाखल होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सुमारे महिनाभरापूर्वी भाताच्या धूळवाफ पेरण्या केल्या होत्या. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने अनेक ठिकाणी उगवलेले भाताचे अंकुर करपून गेले आहेत. परिणामी शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
पावसाअभावी केवळ शेतीच नव्हे तर ग्रामीण अर्थकारणालाही फटका बसत आहे. ऊसतोडणी, मजुरी, हमाली आणि शेतीपूरक व्यवसायांवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पाण्याअभावी जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला असून हिरवा चारा आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे कठीण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने पावसासाठी प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला. बैलगाडीच्या मिरवणुकीतून गंगबावीचे पवित्र पाणी आणण्यात आले. त्यानंतर ग्रामदैवत इरदेव, भैरवनाथ, श्री स्वामी समर्थ आणि चक्रेश्वर देवस्थानांमध्ये विधिवत जलाभिषेक करण्यात आला. यावेळी गावातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी पावसासाठी देवदेवतांना साकडे घालण्याची परंपरा जपली जाते. पिंपळवाडीतील ग्रामस्थांनीही याच श्रद्धेतून जलाभिषेक करून चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली. शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य ग्रामस्थांचे डोळे आता आकाशाकडे लागले असून लवकरात लवकर पाऊस पडून शेतीला जीवदान मिळावे, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.