तुरंबे : राधानगरी धरणात ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात सध्या ४.२१ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पाणीसाठा जास्त आहे. पाऊस सुरू झाल्यापासूनच जलसंपदा विभागाने धरणातील पाणी विसर्गाचे योग्य नियोजन केले आहे. महापूर काळात धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे.
राधानगरी धरण परिसरात गेल्या दोन दिवसात पावसाची संततधार सुरु आहे. आज अखेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १६१७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर मागील वर्षी याच दिवसात १०२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मागील वर्षीपेक्षा यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त आहे. मात्र गेल्या दोन दिवसापासून पावसाने संततधार सुरु केली आहे. गेल्या २४ तासात ८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात सध्या ४.२१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. महापूर काळात धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे. यामुळे पावसाच्या पहिल्या दिवसापासूनच खासगी पावर हाऊस मधून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती सुरू केली आहे. महापूर काळात धरणातून अधिक पाणीसाठा सोडला तर महापुराची तीव्रता वाढते. त्यामुळे सुरुवातीपासूनच पाणी विसर्गाचे योग्य नियोजन केले असल्याचे उप अभियंता प्रवीण पारकर यांनी सांगितले.
मागील वर्षी २८ जुलै रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरून सात स्वयंचलित दरवाज्यातून पाणी भोगावती नदीत जात होते. सध्या पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरण पूर्ण भरणेसाठी अजून १३०० ते १५०० मिमी पाऊस लागला तर धरण पूर्ण क्षमतेने भरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.