पेठवडगाव : पुणे–बंगळूरू महामार्गावर 'विना हेल्मेट' नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां दुचाकीस्वारांच्या विरोधात परिवहन विभागाने कडक कारवाई सुरू केली असून, पहिल्याच दिवशी तब्बल १८० प्रकरणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेषतः विना हेल्मेट प्रवास, ट्रिपल सीट, ओव्हरस्पीडिंग आणि लेन कटिंग करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
राज्यात प्रथमच अत्याधुनिक एआय-आधारित रडारयुक्त इंटरसेप्टर यंत्रणा या मार्गावर कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे ५०० मीटर ते १ किलोमीटर अंतरावरून वाहनांची नोंद घेता येते. वाहनांना थांबवण्याची गरज न भासता थेट ई-चलन पाठवले जात असल्याने नियमभंग करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई होत आहे. तासाला शेकडो ई-चलन तयार करण्याची क्षमता या प्रणालीमध्ये असल्याने वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी झाले आहे.
दरम्यान, किणी टोल नाक्यावर सहायक मोटर वाहन निरीक्षक रचना जाधव यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर काहींना थांबवून हेल्मेट वापरण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. हेल्मेटचा वापर केल्यास अपघातातील जीवितहानी टाळता येऊ शकते, याबाबत जनजागृती करण्यात आली.
यापूर्वीच परिवहन विभागाकडून जनजागृती मोहीम राबवून हेल्मेट वापरणाऱ्या वाहनचालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत होते, तर नियमभंग करणाऱ्यांना समुपदेशन करण्यात येत होते. मात्र, आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाल्याने नियम तोडणाऱ्यांना मोठ्या दंडाचा सामना करावा लागत आहे.ही कारवाई पुढील काळात आणखी तीव्र करण्यात येणार असून, महामार्गावर ‘नो हेल्मेट… नो एन्ट्री’ ही भूमिका कठोरपणे राबवली जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि कायद्याचे पालन करण्यासाठी हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.