पुढारी वृत्तसेवा : गावगाड्यातील माणसाचा सन्मान झाला तरच महाराष्ट्राची प्रगती होईल, असे मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. ते 'पुढारी NEWS' च्या 'विचार मान्यवरांचे, स्वप्न नव्या महाराष्ट्राचे' या कार्यक्रमात ते बोलत होते.
सदाभाऊ खोत म्हणाले की, "आम्ही गावागाड्यातून वर आलो, गावगाड्यातील माणूस अजूनही उपेक्षित आहे. त्या प्रत्येक माणसाचा सन्मान झाला तरच महाराष्ट्राची प्रगती होईल. आपल्या राजकारण्यांनी गावगाड्याला गुलामीत ठेवले.अनेक योजनांपासून वंचित ठेवले.त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे गरजेचे आहे."
जलयुक्त शिवार योजान ही राज्यातील ग्रामीण भागासाठी वरदान ठरली आहे. मागील काही वर्षांमध्ये या योजनेच्या माध्यमातून पाणी समस्या सोडविण्यात यश येत आहे, असेही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या शेतकर्याच्या विकासासाठी ठोस धोरणे राबवली. त्यांनी शेतकर्यांचे प्रश्न समजावून घेतले. भाजीपाला नियमन मुक्ती योजना राबवली. उस प्रश्न सोडवण्यासाठी साखरेची किंमत ठरवण्यात त्यांनी ठोस निर्णय घेतले. साखरेची किंमत ३१ रुपयांपेक्षा कमी होता कामा नये, याबरोबर कांदा , दूध या पदार्थांना योग्य दर देण्यासाठी त्यांनी ठोस निर्णय घेतले. किसान रेलमध्ये एक स्वतंत्र रेल्वे डबा शेतमालासाठी ठेवण्याचा निर्णय झाला, असेही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. आज ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत आहेत. शेतकरी आणि ग्रामीण भागाला निधी दिला की, सरकारच्या तिजोरीवर ताण पडणार, अशी ओरड सुरु होते. मात्र लाडकी बहीण योजना ही राज्यातील प्रत्येक महिलेच्या विकासासाठी पूरक आहे, असेही सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितले.