पुढारी ऑनलाईन डेस्क : "कोणत्याही खात्याचा रोडमॅप करायचा असेल तर तो रोडमॅप जगावा लागतो. नावीन्यपूर्ण कार्यक्रम द्यावे लागतात. राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून काम सुरू केल्यानंतर मी सर्वप्रथम 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' ही योजना हाती घेतली," असे स्पष्ट करत ही योजना कशी सूचली? याबाबतची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी आज (दि.१३) दिली. ते 'पुढारी NEWS' च्या 'विचार मान्यवरांचे, स्वप्न नव्या महाराष्ट्राचे' या कार्यक्रमात बोलत होते.
'पुढारी NEWS' च्या 'विचार मान्यवरांचे, स्वप्न नव्या महाराष्ट्राचे' या कार्यक्रमात राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी त्यांचा जीवनप्रवास आणि आरोग्य विभाग सांभाळताना आलेला अनुभव याबद्दल मनमोकळा संवाद साधला. ते म्हणाले की, "आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी सर्वप्रथम 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' ही योजना हाती घेतली. ही योजना हाती घेतना माझ्याच कुटुंबातील वैयक्तिक अनुभव माझ्या पाठीशी होते. आमच्या घरी आई कुटुंबप्रमुख होती. आईवर घरची सगळी जबाबदारी होती. एक दिवस ती घरी आली आणि थंडी वाजून आल्याच्या कारणाने ती झोपी गेली. मी तिला एक गोळी आणून दिली आणि तासाभराने तिचा ताप उतरला; मग आम्ही खेळायला गेलो. आईवर घरची सगळी जबाबदारी असते, पण स्वतःच्या आरोग्याकडे तिचे दुर्लक्ष होते. हे लक्षात घेऊन मी ही योजना राबवली. यामध्ये ४ कोटी १९ लाख महिलांची आरोग्य तपासणी आणि उपचार झाले आहेत. ही योजना राबवण्यासाठी निधीची गरज होती, ती जिल्हा नियोजन मंडळातून देण्याचा निर्णय झाला." असेही तानाजी सावंत यांनी सांगितले.
"माझे शिक्षण अभियांत्रिकीमधील आहे, त्यामुळे त्याच्याशी संबंधित किंवा शिक्षणाशी संबंधित एखादे खाते आपल्याला मिळावे, अशी अपेक्षा होती; पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य हे खाते माझ्याकडे विश्वासाने सोपवले. तुमचे सामाजिक काम पाहून, हे खाते तुमच्याकडे देत आहोत, असे दोघांनी मला सांगितले. तुम्ही जर विश्वासाने माझ्याकडे हे खाते देत असला तर मी सुद्धा सिद्ध करून दाखवतो, असे सांगून मी आरोग्य खात्याची जबबादारी स्वीकारली होती, असेही तानाजी सावंत यांनी सांगितले.
"माझे वडील वारकरी होते आणि आमचे कुटुंब वारकरी आहे. वारीचे महत्त्व लक्षात घेत मी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी ही योजना राबवली. २०२३ला आमच्या साखर कारखान्याच्या सीएसआर फंडातून ही योजना राबवली, त्याचा लाभ ११.५ लाख वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला. तर पुढील आरोग्य विभागाने याचा आणखी विस्तार केला आणि १५ लाख वारकऱ्यांना याचा लाभ झाला." अशीही माहिती तानाजी सावंत यांनी यावेळी दिली.
जागृक पालक, सुदृढ बालक या योजनेचा लाभ २ कोटी ९२ लाख जणांना झालेला आहे, तर आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे या योजनेतून १८ ते ३५ वयोगटातील ३ कोटी लोकांना लाभ झालेला आहे, असे त्यांनी तानाजी सावंत यांनी सांगितले.