कडगाव : भुदरगड तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेल्या पाटगाव मध्यम प्रकल्पाचा मौनीसागर जलाशय मंगळवारी (दि. ८) दुपारी तीन वाजता पूर्ण क्षमतेने भरला. १०० टक्के पाणीसाठा झाल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. सांडव्यातून सध्या अल्प प्रमाणात विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.
धरणात सुमारे ३.७५ टीएमसी साठा झाला असून, प्रकल्पाची पातळी ६२६.६० मीटर झाली आहे. धरण परिसरात जून महिन्यापासून आजअखेर सुमारे ४९२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गतवर्षीच्या तुलनेत धरण सुमारे दोन महिने उशिरा भरले. यंदा पावसाची अनिश्चितता आणि कमी झालेल्या पर्जन्यमानामुळे धरण भरण्यास उशीर झाला.