कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या फेरनिवडणुकीला शुक्रवारी उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली. यामुळे पुन्हा निवडणूक होणार की यापूर्वी बिनविरोध झालेल्या निवडीवरच शिक्कामोर्तब होणार याकडे सभासदांसह सहकार आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील कार्यक्षेत्र असलेल्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 2024-25 ते 2029-30 या पंचवार्षिक निवडणुकीची 5 डिसेंबर 2024 रोजी सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाने घोषणा केली होती. त्यानुसार सामान्य उत्पादक सभासदांच्या 12, महिला 2, ब वर्ग व्यक्ती गट एक, ब वर्ग संस्था एक आणि मागासवर्गीय प्रवर्ग एक अशा एकूण 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला.
उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 19 जानेवारी रोजी 17 जागांसाठी 17 अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली. तसा अहवाल प्राधिकरणाला सादर करण्यात आला. 24 जानेवारी रोजी प्राधिकरणाकडून याची अधिकृत घोषणा केली जाणार होती. दरम्यान या निवडणूक प्रक्रियेविरुद्ध विरोधी गटाने न्यायालयात दाद मागितली.
निवडणूक प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविण्यात आलेली नाही. सूचक आणि अनुमोदक यांचा सलग चार वर्ष ऊस कारखान्याला जाणे बंधनकारक आहे. अन्य कारखान्यात त्यांनी तो पाठवता कामा नये, तसेच सलग तीन सर्वसाधारण सभांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. छाननी प्रक्रियेत या नियमांची योग्य पडताळणी झालेली नाही, असा आक्षेप घेण्यात आला होता. त्यानुसार बिनविरोध झालेल्या निवडणुकीला स्थगिती देत प्राधिकरणाने पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. 29 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणारी होती. याच दरम्यान बिनविरोध निवडणूक स्थगितीच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले त्यावर सुनावणी होऊन प्राधिकरणाने फेरनिवडणुकीच्या दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत शुक्रवारी स्थगिती दिली. याबाबतचा आदेश शुक्रवारी मिळाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिल्लारी यांनी दिली.