Kolhapur Ten River Water Restrictions
गुडाळ : कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा प्राधान्याने पिण्याच्या वापरासाठी राखून ठेवण्याच्या उद्देशाने पाटबंधारे विभागाने पंचगंगेसह दहा नद्यांवरील पाणी उपशावर आज (दि. १५ जून) पासून पुढील आदेशापर्यंत बंदी लागू केली आहे. हवामान विभागाने अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला असून, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) यांच्या कार्यकारी अभियंता श्रीमती ज्योती देवकर यांनी उपसाबंदीचे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार पंचगंगा, भोगावती, दूधगंगा, वारणा, तुळशी, कासारी, कडवी, कुंभी, धामणी आणि जांभळी या नद्यांच्या दोन्ही तीरांवरील शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या सर्व पंपांवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार आहे.
बंदीच्या कालावधीत कोणत्याही व्यक्तीने अनधिकृतपणे पाणी उपसा केल्याचे आढळल्यास संबंधित पंप जप्त करण्यात येईल. तसेच संबंधित परवानाधारकाचा उपसा परवाना एक वर्षासाठी रद्द करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या कारवाईमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतातील पिके आधीच कोमेजण्याच्या स्थितीत असून, उपसाबंदीमुळे ती वाचवण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.