कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या तोंडावर कांद्याच्या दराने अचानक उसळी घेतल्याने गृहिणींच्या बजेटला फटका बसला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत ३० ते ३५ रुपये किलो दराने मिळणारा कांदा आता थेट ६० रुपये किलोवर पोहोचला आहे. अवघ्या काही दिवसांत दर जवळपास दुप्पट झाल्याने ग्राहकांच्या डोळ्यांत कांद्याने पाणी आणले आहे.
सध्या बाजारात कांद्याची आवक तुलनेने कमी असून, उपलब्ध कांद्याच्या दर्जानुसार दरात चढ-उतार होत आहेत. पावसामुळे काही भागांतील कांद्याच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. त्यातच नवीन कांदा बाजारात येण्यास काहीसा विलंब होत असल्याने पुरवठा आणि मागणीचे गणित बिघडले आहे. परिणामी, घाऊक बाजारातील दर वाढताच त्याचा परिणाम किरकोळ बाजारावर झाला आहे.
नेहमीपेक्षा दुप्पट दराने खरेदी
गणेशोत्सवाच्या काळात घरगुती जेवणावळी, उपवासानंतरचे पदार्थ, गणपती आगमन, गौरी आगमन पूजा यासाठी लागणारा पारंपरिक नैवेद्य, फराळ तसेच पाहुणचारासाठी कांद्याची मागणी वाढते. हॉटेल, खानावळी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडूनही मागणी वाढल्याने दरावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांना नेहमीपेक्षा जवळपास दुप्पट दराने कांद्याची खरेदी करावी लागत आहे.
* आवक कमी आणि मागणी वाढल्याने दरवाढ
* गणेशोत्सवामुळे घरगुती तसेच व्यावसायिक मागणीत वाढ
* वाढलेल्या दराचा थेट परिणाम स्वयंपाक घराच्या बजेटवर