कोल्हापूर : जिल्ह्यातील मतदारयादीतून नावेच रद्द होणाऱ्या मतदारांची संख्या शनिवारी २ लाख ३ हजार २७७ इतकी झाली. ही तर नावे मतदारयादीतून रद्दच होणार असून, त्यात आणखी भर पडणार आहे. शनिवार (दि. ८) पर्यंत मतदारयादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) सुरू राहणार आहे. या कालावधीत ही संख्या वाढणार आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३३ लाख ५५ हजार ५२४ मतदारांपैकी शनिवारपर्यंत (दि. १) २७ लाख १५ हजार १६१ मतदारांची पडताळणी झाली आहे. हे प्रमाण ८०.९२ टक्के इतके आहे. या पडताळणीदरम्यान आतापर्यंत २ लाख ३ हजार २७७ मतदारांचे गणना अर्जच भरून प्राप्त झालेले नाहीत. पडताळणीत यापैकी काही मृत, दुबार आणि स्थलांतरित मतदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे ही नावे मतदारयादीतून वगळली जाणार, हे स्पष्ट आहे.
जिल्ह्यात ३३ लाख ५५ हजार ५२४ मतदारांपैकी ३३ लाख ५१ हजार ७०० मतदारांना गणना अर्जांचे वाटप झाले आहे. उर्वरित मतदारांना अद्याप हे गणना अर्ज वाटप करण्याचे काम सुरू आहे. अर्ज वाटप करणे आणि ते भरून घेणे, भरलेल्या अर्जांचे ऑनलाईन पद्धतीने स्कॅनिंग करून घेतले जात आहे. ही प्रक्रिया दि. ८ ऑगस्टपर्यंतच सुरू राहणार आहे. याकरिता आता केवळ ७ दिवस राहिले आहेत. यादरम्यान, ज्यांचे अर्ज येणार नाहीत, त्यांचे नाव मतदारयादीतून वगळलेच जाणार आहे.
अर्ज भरला तरच मतदारयादीत नाव
मतदारांनी गणना अर्ज भरून दिले तर आणि तरच त्यांचे नाव मतदारयादीत राहणार आहे. जे अर्ज भरून देणार नाहीत, त्यांचे नाव मतदारयादीतून रद्द होणार आहे. यामुळे येत्या दि. ८ ऑगस्टपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याने ज्यांनी अद्याप गणना अर्ज भरून दिलेला नाही त्यांनी तो तत्काळ द्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कागल मतदारसंघ आघाडीवर; कोल्हापूर उत्तर सर्वात मागे
मतदार पडताळणीत कागल मतदारसंघ जिल्ह्यात आघाडीवर आहे. या मतदारसंघात ८७.२७ टक्के मतदारांची पडताळणी झाली आहे. सर्वात मागे कोल्हापूर उत्तर मतदार संघ असून, येथे ६२.२० टक्के मतदारांची पडताळणी झाली आहे.