कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : रायगडावरील 350 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपतो ना संपतो तोच शिवभक्त-इतिहासप्रेमींना वेध लागतात पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचे. संपूर्ण जुलै महिन्यात विविध संघटनांच्या वतीने या मोहिमेचे आयोजन केले जाते. यात देश-विदेशातून साहसवीर मोठ्या संख्येने सहभागी होतात. याची जय्यत तयारी विविध संसघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
शिवकाळात दि. 12 व 13 जुलै 1660 रोजी पन्हाळगड ते विशाळगड या मार्गावर प्रचंड रणकंदण घडले. रयतेच्या स्वराज्याच्या रक्षणार्थ शिवछत्रपतींच्या नेतृत्वाखाली अनेक ज्ञात-अज्ञात मावळे प्राणपणाने लढले. अनेकांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. अशा या स्फूर्तिदायी इतिहासाला उजाळा देण्यासाठी पन्हाळगड ते पावनखिंड या साहसी पदभ—मंती मोहिमेचे आयोजन केले जाते.
शिवछत्रपतींच्या रक्षणासाठी नरवीर शिवा काशीद, वीर बाजीप्रभू- फुलाजी प्रभू, विठोजी काटे, संभाजी जाधव यांसह अनेक ज्ञात-अज्ञात मावळ्यांनी पन्हाळगड ते विशाळगड या मार्गावर आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या या हौतात्म्यास अभिवादन करण्यासाठी आणि शिवछत्रपतींच्या चरित्रातील या अविस्मरणीय घटनेच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी हजारो आबालवृद्ध मावळे व रणरागिणी या मोहिमेत सहभागी होत असतात.