कोल्हापूर : कळंबा तलाव व जयंती, गोमती नदी प्रदूषणप्रकरणी गुरुवारी राज्य शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाचे सचिव, महाराष्ट्र नियंत्रण मंडळ आणि कोल्हापूर महापालिका यांना कोल्हापूर सर्किट बेंचने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असल्याची माहिती अॅड. सर्जेराव खोत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. पुढील सुनावणी 5 मार्च रोजी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी सागर घोरपडे यांनी याचिका दाखल केली आहे.
अॅड. खोत म्हणाले, सर्किट बेंचमध्ये दाखल केलेल्या याचिकेत काही मुद्दे मांडले आहेत. यामध्ये कोल्हापूर महापालिका अनेक वर्षापासून सांडपाणी थेट जयंती नदीत सोडत आहे. कळंबा तलावात परिसरातील हॉटेलमधील सांडपाणी मिसळत आहे. परिणामी जयंती नदी, गोमती नदी या नद्या न राहता नाला बनल्या आहेत. यामुळे पंचगंगा नदीच्या प्रदूषणात भर पडत आहे. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कळंबा तलावातील पाणी प्रदूषित झाले. या प्रदूषणामुळे जयंती नदीकाठी असणार्या प्राचिन मंदिरांच्या अस्तित्वावर आणि पावित्र्याला धोका निर्माण झाला आहे. यातून संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होत आहे. ही याचिका नदी वाचविणे, पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षेची, मंदिराच्या पावित्र्याच्या रक्षणाची आणि कोल्हापूर भविष्यासाठीची लढाई असल्याचे अॅड. खोत यांनी सांगितले. यावेळी सागर घोरपडे उपस्थित होते.
प्रदूषणामुळे धोका निर्माण झालेली मंदिरे
कात्यायनी देवी मंदिर, कळंबा परिसरातील महादेव मंदिर, जयंती- गोमती संगम येथील सटवाई देवी मंदिर, यल्लमा देवी मंदिर, सिध्दीविनायक मंदिर, फलगुलेश्वर महादेव मंदिर.
याचिकेतील प्रमुख मागण्या
कळंबा तलाव, जयंती नदीत जाणारे सांडपाणी थांबवा
तातडीने एसटीपी प्रकल्पाची उभारणी करा
जयंती, गोमती नदीचे नदी म्हणून पुनरुज्जीवन करावे
कळंबा तलाव व नदी परिसर हेरिटेज व इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करावा