कोल्हापूर : गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्यासोबत शौमिका महाडिक यांची चर्चा झाली होती. त्यांचे सर्व प्रश्न सोडवले गेले, तरीही नवीद मुश्रीफ यांना राजकीय कारणास्तव टार्गेट केले जात आहे, असा संशय काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या आंदोलनानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
राज्य सरकार प्रचंड कर्जबाजारी असताना आणि कर्मचार्यांचे पगार वेळेत होत नसताना कायद्याचे पालन करणार्या अधिकार्यांचे खच्चीकरण करणे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या द़ृष्टीने दुर्दैवी बाब असल्याची टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील एका आयपीएस अधिकार्यांना झापल्याच्या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. पवार यांनी नियोजित दौरे रद्द केल्यानंतर या विषयावर अधिकच टीका होत असून, याच पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
एकेकाळी यूपीएससी अधिकारी महाराष्ट्रात सेवा करण्याचे स्वप्न पाहायचे; मात्र आता त्यात वास्तव किती आहे, याबाबत शंका निर्माण झाली आहे, अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना पाटील म्हणाले, कायद्याचे पालन करणार्या अधिकार्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची आहे. अशा किरकोळ प्रकरणात स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी फोन करणे किती योग्य आहे, हे तपासणे महत्त्वाचे आहे. अशा अपेक्षा अजित पवार यांच्याकडून नव्हत्या. दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सामावून घेण्याच्या शासन निर्णयाला मंत्री छगन भुजबळ यांनी न्यायालयात जाण्यासाठी दिलेल्या सूचनेवरदेखील पाटील यांनी टीका केली.
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मंत्रिमंडळाचा निर्णयाविरोधात मंत्रिमंडळातीलच मंत्री जात आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ दोन गटांत विभागलेले दिसत आहे आणि मंत्र्यांवरचे नियंत्रण सुटले आहे, असा आरोप त्यांनी केला.