कोल्हापूर : राज्यातील सरकार दिवाळखोर सरकार आहे. योजनांसाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या पगाराकरिता सरकारने ओव्हट ड्राफ्ट घेऊन महाराष्ट्राचे दिवाळ काढण्यात यश मिळविले असल्याचा आरोप करून सत्ताधारी पक्षाचे आमदार बंड पुकारतात यावरून या सरकारची लायकी दिसून येते, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्राच्या कोणत्याही गावात, शहरात महिला सुरक्षित नाहीत. गेल्यावर्षी ६४ हजार महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्याचे सरकार अद्याप उत्तर देऊ शकलेले नाही. महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सर्वत्र महायुती विरोधात वातावरण दिसत असल्याने महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन अटळ आहे. त्यामुळे सरकारने निर्णय घेण्याचा लावलेला घडाका लोकहिताचा नसून तो त्यांच्या हितासाठी आहे, असेही ते म्हणाले.
यापुढे ज्या काही एक-दोन कॅबिनेट राहिल्या आहेत त्यामध्ये शक्य तेवढी सरकारला लूट करायची आहे. कारण त्यांना माहिती आहे की आपली सत्ता आता येणार नाही. म्हणून महाराष्ट्राचा लिलाव करायचा, अशी परिथिती या सरकारची आहे, असल्याचेही पटोले यांनी सांगितले.
जागेचे वाटप करण्याचा सरकारचा मोठा कार्यक्रम सुरू आहे. कवडीमोल किमतीत धनदांडग्यांना जाता, जाता जागा सरकार जागा देऊ लागले आहे. जीआर काढण्याचा कार्यक्रम आता रात्रभर चालेल. आम्हीदेखील सरकारमध्ये होतो. निवडणुकीच्या तोंडावर आम्ही निर्णयही घेतले आहेत, परंतु शेकड्याने, हजाराने निर्णय घेणारे हे पहिलेच सरकार आहे. गोंधळलेल्या सरकारचे हे लक्षण असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.