Kolhapur Flood News Pudhari Photo
कोल्हापूर

Kolhapur Flood News: मुरगूडला महापुराचा वेढा: कोल्हापूर, निपाणी, गडहिंग्लजशी संपर्क तुटला; शेकडो वाहने, प्रवासी अडकले

Kolhapur flood situation latest update: शहराला बेटाचे स्वरूप, सर्व प्रमुख मार्ग पाण्याखाली

पुढारी वृत्तसेवा

मुरगूड: मुसळधार पावसाने रौद्ररूप धारण केलेल्या वेदगंगा नदीच्या महापुराने आणि सरपिराजीराव तलावाच्या सांडव्याने मुरगूड शहराला चारही बाजूंनी वेढा घातला आहे. शहराकडे येणारे आणि शहरातून बाहेर जाणारे सर्वच प्रमुख राज्यमार्ग पाण्याखाली गेल्याने मुरगूडला बेटाचे स्वरूप आले आहे. यामुळे शेकडो वाहने आणि हजारो नागरिक शहरातच अडकून पडले आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या हाहाकारामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

वाहतुकीचे तीनही प्रमुख मार्ग ठप्प

वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत झालेली प्रचंड वाढ आणि परिसरातील तलाव ओसंडून वाहू लागल्याने वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. शहराला बाहेरच्या जगाशी जोडणारे मुख्य मार्ग बंद झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. शिंदेवाडीजवळ वेदगंगेचे पाणी रस्त्यावर आल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. निढोरीजवळ पुराचे पाणी आल्याने हा राज्यमार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे कोल्हापूर, निपाणी आणि गडहिंग्लज या प्रमुख शहरांशी मुरगूडचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

  • मुरगूड - निपाणी मार्ग: शिंदेवाडीजवळ वेदगंगेचे पाणी रस्त्यावर आल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे.

  • मुरगूड - मुदाळतिट्टा मार्ग: निढोरीजवळ पुराचे पाणी आल्याने हा राज्यमार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

  • मुरगूड - गडहिंग्लज मार्ग: सरपिराजीराव तलावाच्या सांडव्याचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूकही थांबली आहे.

प्रवासी आणि वाहनचालकांची मोठी गैरसोय

गोवा, कर्नाटक आणि कोकणात जाणारे अनेक अवजड मालवाहू ट्रक, टँकर आणि परप्रांतीय वाहने पर्यायी मार्ग नसल्याने मुरगूडच्या वेशीवरच अडकून पडली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ही वाहने एकाच जागी थांबून असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. रात्रीच्या अंधारात पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका मालवाहू ट्रकला स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी बाहेर काढून मदत केल्याची घटनाही घडली. एस.टी. महामंडळाची बससेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी कुचंबणा झाली आहे.

आरोग्यसेवेचा प्रश्न गंभीर; बोटींची गरज

शहराचा संपर्क तुटल्याने सर्वात गंभीर प्रश्न आरोग्यसेवेचा निर्माण झाला आहे. उपचारासाठी बाहेरून मुरगूडमधील रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे मार्ग बंद झाले आहेत, तर शहरातील गंभीर रुग्णांना कोल्हापूर किंवा निपाणीसारख्या मोठ्या शहरांमध्ये हलवणे अशक्य झाले आहे. या पूरकाळात रुग्णांची ने-आण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने बोटींची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे, जेणेकरून कोणतीही वैद्यकीय आणीबाणी हाताळता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT