कोल्हापूर : विकासाला विरोध करतोय, असे म्हणणार्या आमदार राजेश क्षीरसागर यांनी शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यांचे काय ते सांगावं, मुख्यमंत्र्यांसह सरकारला सांगून एक हजार कोटी रुपये आणावेत आणि रस्ते दुरुस्त करावेत, असे केल्यास त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असा उपरोधिक टोला आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
आमदार क्षीरसागर यांना विनंती आहे, शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यांचे काय ते प्रथम सांगा. सरकारला सांगून एक हजार कोटी रुपये आणून शहरातील रस्ते करावेत. काडक्याच्या उन्हात पाणी उपसा बंदी आहे, विजेचा तुटवडा आहे. पाण्याचा तुटवडा होणार असे मुख्यमंत्र्यांनी जानेवारीत सांगितले आहे, मग विजेचे नियोजन केले नाही. सरकार चार महिने झोपा काढत होते? कोयनेत पाणी कमी असल्याने दोन हजार मेगावॅट विजेचा तुटवडा असल्याचे सांगत आहेत. सरकारला नियोजन समजले नाही. हे सरकारचे अपयश आहे. सरकारच्या निष्क्रिय धोरणाचा फटका शेतकर्यांना बसत आहे. आठ तास अखंडित वीज मिळत नाही. वसुलीत नंबर एक बक्षीस मिळाले आता थकबाकीसाठी बक्षीस मिळेल अशी स्थिती निर्माण करू, असा इशारा आमदार पाटील यांनी दिला.
आमदार पाटील म्हणाले, ग्राहकांची इच्छा असेल तरच स्मार्ट मीटर बसवावेत. स्मार्ट मीटरचा ठेका दिलेल्या कंपन्यांनी भाजपला मदत केली आहे. त्यामुळे सरकार काय करणार? स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिल वाढत असल्याची तक्रार आहे. गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, एक लाख कोटी इतर कामांवर खर्च करावेत, राज्याच्या विविध भागांतून शेतकरी मोर्चात सहभागी होणार आहेत.