कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनावरून माजी खा. राजू शेट्टी यांनी अधिकाऱ्यांना ‘चोपून काढू,’ असा इशारा दिल्यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला. ‘अधिकाऱ्यांना मारायला राजू शेट्टी म्हणजे काय राक्षस आहेत का? सरकारने एकदा मनात आणले तर तुम्हाला उलटे टांगून ठेवेल,’ असा सज्जड दम आ. क्षीरसागर यांनी भरला. सत्तेचा लाभ घेऊन शासकीय योजनांना विरोध करू नये, असा इशारा देत त्यांनी स्वपक्षीय आ. चंद्रदीप नरके यांनाही खडे बोल सुनावले.
लक्ष वेधण्यासाठी सतेज पाटील यांची स्टटंबाजी
‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीबाबत आ. क्षीरसागर म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. काँग्रेस नेते सतेज पाटील आणि भाजप नेते धनंजय महाडिक यांची युती होणे कधीही शक्य नाही. पाटील यांच्या राजकारणात आता काही शिल्लक राहिलेले नाही. केवळ प्रकाशझोतात राहण्यासाठी आणि लोकांचे लक्ष वेधण्यासाठीच ते भेटीगाठींची ‘स्टंटबाजी’ करत आहेत.’
मंत्र्यांचे ‘रिपोर्ट कार्ड’ तपासा, शब्द पाळा
आ. क्षीरसागर यांनी मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘मंत्र्यांनी फक्त स्वतःच्या मतदारसंघापुरते मर्यादित न राहता पक्षवाढीसाठी काम केले पाहिजे. बाहेरून आलेल्यांना मंत्रिपद मिळाल्याने त्यांना पक्षाची जाण नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांचे ‘रिपोर्ट कार्ड’ तपासावे. अडीच वर्षांनंतर फेरबदल करण्याचा शब्द शिंदे यांनी दिला होता. कोल्हापुरात शिवसेनेचा खरा ब्रँड राजेश क्षीरसागरच असून माझ्या कार्यालयाबाहेर लागणारी गर्दी याची साक्ष देते.’