कोल्हापूर : महसूलविषयक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने कोल्हापूर येथे महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे (एमआरटी) स्वतंत्र खंडपीठ स्थापन करावे, अशी मागणी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. या मागणीचे निवेदन देत त्यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती आबिटकर यांनी दिली.
सध्याच्या परिस्थितीत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील महसूलचे विविध दावे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. या प्रकरणांच्या सुनावणीसाठी नागरिकांना दूरच्या ठिकाणी जावे लागते. यामुळे त्यांचा वेळ, पैसा खर्च होतो. त्यासह सुनावणी व प्रकरणे निकाली काढण्यासही वेळ लागत आहे. त्यामुळे या चार जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे स्वतंत्र खंडपीठ सुरू करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आबिटकर यांनी सांगितले. कोल्हापूर महसूल न्यायाधिकरणाचे स्वतंत्र खंडपीठ सुरू झाल्यास कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील महसूलविषयक प्रकरणांच्या सुनावणीसाठी नागरिकांना दूरचा प्रवास कमी होईल. त्यांचा वेळ, पैसा आणि श्रमही वाचणार आहे. यामुळे कोल्हापूर येथे महसूल न्यायाधिकरणाचे स्वतंत्र खंडपीठ स्थापन करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी आबिटकर यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.