पुढारी ऑनलाईन डेस्क : विशाळगड अतिक्रमण हटाव आंदोलनावेळी (Vishalgad Encroachment) विशाळगडसह पायथ्याला झालेल्या हिंसक घटनेप्रकरणी एमआयएमने आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवार १९ जुलै रोजी हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात एमआयएमकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातील एमआयएमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी फेसबुक पोस्टमधून सांगितले आहे.
विशाळगडावर झालेल्या हिंसक घटनेप्रकरणी पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली आहे. दगडफेक, जाळपोळ, तोडफोड, पोलिसांवरील हल्लाप्रकरणी ६० जणांविरुद्ध शाहूवाडी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी २१ जणांना अटक करण्यात आली. या सर्वांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशीही विशाळगडसह परिसरात तणावपूर्ण शांतता होती. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा फौजफाटा कायम ठेवण्यात आला आहे.
विशाळगड प्रकरणी झालेल्या घटनेला सर्वस्वी जबाबदार असलेल्या संभाजीराजे यांना तत्काळ अटक करा, त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना शिष्टमंडळाने सोमवारी दिले. यावेळी हिंसाचार प्रकरणी पोलिस अधीक्षकांचीही बदली करावी, अशीही मागणी करण्यात आली. जमावबंदी आदेश असताना हे आंदोलन झाले कसे, इतक्या संख्येने लोक आले कसे? असे सवाल करत ज्यांनी या आंदोलनाचे नियोजन केले होते, त्यांच्याकडूनच दर्ग्यावर हल्ला झाला. गजापूरमध्ये अतिक्रमणाचा कोणताही विषय नसताना मुस्लिम समाजावर अत्याचार करण्यात आले. पोलिसांना मारहाण, पत्रकारांना धमकावणे असेही निंदनीय प्रकार घडले. या सर्व प्रकारात विविध गंभीर कलमे लावावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संभाजीराजे यांच्या आंदोलनानंतर झालेला हिंसाचार निषेधार्ह असल्याचे खासदार शाहू महाराज यांनी सोमवारी सांगितले. त्यांनी संभाजीराजे यांच्या आंदोलनाविरोधात भूमिका घेत हा हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना घडली, हे अत्यंत क्लेशदायक असल्याच्या भावनाही सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे व्यक्त केल्या.