कोल्हापूर-कराड महामार्गावरील धोकादायक खड्डे. 
कोल्हापूर

Kolhapur Karad Highway | कोल्हापूर-कराड महामार्गाच्या चिंधड्या!

रस्त्यावर शेकडो ठिकाणी भलीमोठी भगदाडे, सेवारस्त्यांची झालीय चाळण

पुढारी वृत्तसेवा

सुनील कदम

कोल्हापूर : कोल्हापूरपासून ते कराडपर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या पार ‘चिंध्या’ झाल्या आहेत. शेकडो ठिकाणी भलीमोठी भगदाडे पडली असून सेवा रस्ते केवळ नावाला शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या महामार्गावरील प्रवास आजकाल जीवघेणा बनला आहे.

शासनाने २०१४ साली सातारा-कागल महामार्गाच्या सहापदरीकरणाला मंजुरी दिली; पण प्रत्यक्षात सप्टेंबर २०२२ मध्ये सहापदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामाचे सातारा जिल्ह्यातील शेंद्रे ते सांगली जिल्ह्यातील पेठनाका आणि पेठनाका ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल असे दोन टप्पे केले आहेत. दोन्ही टप्प्यांची कामे दोन वेगवेगळ्या कंपन्यांकडे देण्यात आलेली आहेत; पण दोन्ही कंपन्यांचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. चार वर्षांत कामाची मुदत संपून पुन्हा मुदतवाढ देऊनही निम्मे-अर्धे कामही अपूर्ण आहे.

खड्डे नव्हे भगदाडे!

या महामार्गावरील कोल्हापूर ते कराड या अंतरावर रस्त्यात ठिकठिकाणी नुसते खड्डे पडलेले नाहीत तर आता पावसाळ्यात या खड्ड्यांची चक्क भगदाडे झाली आहेत. एक-दोन नव्हे तर शेकडो भगदाडे या महामार्गावर आहेत. पावसाळ्यात त्यात पाणी साचल्याने वाहनधारकांना अंदाज येत नाही आणि हमखास वाहने त्यात आदळून एक-दोन पार्ट मोडून घेतात. या महामार्गावरून प्रवास करणारे वाहनधारक बांधकाम विभागाचा ‘उद्धार’ करीतच मार्गक्रमण करताना दिसत आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिकाही चालूच आहे.

वाहतुकीची प्रचंड कोंडी!

या महामार्गावरून दररोज किमान ९० हजार ते १ लाख छोट्या-मोठ्या वाहनांची ये-जा चालते; पण जुना महामार्ग अनेक ठिकाणी बंद करण्यात आल्याने हजारो वाहनधारकांना धोकादायक सेवा रस्त्यांशिवाय पर्याय राहिलेला नाही; पण सेवा रस्त्यांची अवस्था तर अत्यंत बिकट आहे. सेवा रस्ते ठिकठिकाणी खचले आहेत, खड्डेमय झाले आहेत. प्रामुख्याने अंबप फाटा, वाठार, किणी-घुणकी, कणेगाव, येलूर, नेर्ले, कासेगाव या ठिकाणचे सेवारस्ते अंगावर काटा आणणारे आहेत. परिणामी या मार्गावर आजकाल कित्येक ठिकाणी वाहतूक कोंडी आणि अपघात हे नित्यनेमाचे होऊन बसले आहेत. या महामार्गावर दररोज नव्या आठ-दहा हजार वाहनांची भर पडताना दिसत आहे आणि वाहतुकीचा सगळा बट्ट्याबोळ उडताना दिसत आहे.

काम जवळपास ठप्प!

मागील चार-सहा महिन्यांपासून या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम ठप्प आहे. ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांचे अर्धवट पडलेले सांगाडे वाहतूक कोंडीला हातभार लावताना दिसत आहेत. रस्त्यावरील छोटे-मोठे पूल, सेवा रस्ते, उड्डाणपूल, गटारी, पुलांचे रुंदीकरण, भुयारी मार्ग, जोडरस्ते अशी शेकडो कामे आज अर्धवट आणि बंद अवस्थेत आहेत. ती कधी पूर्ण होणार, याचे हमखास उत्तर मात्र कुणाकडेच नाही, असे दिसते.

टोलवसुली कशासाठी?

आज या महामार्गावरील वाहतूक सुरक्षित नाही. अन्य महामार्गांप्रमाणे अतिजलद नाही. प्रमुख महामार्गाची आणि सेवा रस्त्यांची पार धुळधाण झालेली आहे. दोन तासांच्या प्रवासासाठी चार-पाच-सहा तास लागत आहेत. महामार्गावर कोणत्याही नागरी सुविधा उपलब्ध नाहीत. असे असताना या मार्गावर टोलवसुली मात्र बिनदिक्कतपणे सुरू आहे. ही टोलवसुली नेमकी कोणत्या कारणासाठी आहे, हेच कुणाला माहीत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT