कोल्हापूर : अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी शनिवारी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले. त्यांची भूमिका योग्यच आहे, असे सांगत सरकारने याबाबत समन्वय साधला पाहिजे, असे खासदार शाहू महाराज यांनी सांगितले. दसरा चौकात जरांगे यांच्या आंदोलनाला सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला.
खा. शाहू महाराज म्हणाले, जरांगे यांनी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकार आणि जरांगे यांच्यातील समन्वय महत्त्वाचा आहे. तो सरकारने ठेवावा. अॅड. बाबा इंदूलकर म्हणाले, कोल्हापूर गॅझेट का लागू केले पाहिजे, याचा सविस्तर अभ्यास करून तयार केलेले पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहेत. 1881 मध्ये कोल्हापूर संस्थानची लोकसंख्या 7 लाख होती. त्यात 63 हजार 787 मराठा होते. उर्वरित 63 टक्के कुणबी होते. 1910 मध्ये जनगनना झाली तेव्हा जात सांगताना अनेक सामाजिक अडचणी येत होत्या. त्यामुळे मराठा असे सांगितले गेले. परिणामी, 1911 मध्ये मराठा लोकसंख्या 370 टक्क्यांनी वाढली, तर 370 टक्क्यांनीच कुणबी लोकसंख्या घटली. याची नोंद व्हाईस रॉय यांच्या सेंट्रल प्रॅव्हिन्स कॅन्डबेरार रिझनमध्ये पान नंबर 368-69 नोंद आहे.
यावेळी विजय देवणे, दिलीप देसाई, बाबा पार्टे, अनिल घाटगे, गणी आजरेकर, महादेव पाटील, काका पाटील, अमरसिंह निंबाळकर, मोहन सुर्वे, फिरोजखान उस्ताद, अविनाश दिंडे, महादेव केसरकर, राजू जाधव आदी उपस्थित होते.
‘आमचा मराठा... कुणबी मराठा’
यावेळी सकल मराठा समाजाने जोरदार घोषणाबाजी केली. ‘एक मराठा ... लाख मराठा’, ‘कोल्हापूर गॅझेटचा अंमल झालाच पाहिजे’, ‘आमचा मराठा... कुणबी मराठा’ अशा घोषणांनी परिसर दणाणला.
भर उन्हात आंदोलन
सकल मराठा समाजाने जरांगे -पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यासाठी दसरा चौकात भर उन्हात आंदोलन झाली. खा. शाहू महाराज यांच्यासह सर्व आंदोलक रखरखत्या उन्हात ठिय्या मारून होते.