कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस आंब्याची आवक वाढली आहे. दिवसाकाठी सुमारे चार हजार बॉक्स दाखल होत आहेत. आवक वाढली असली तरी दरात फारसा बदल झालेला नाही. दर काही प्रमाणात कमी झाला असला तरी अजूनही सर्वसामान्यांसाठी आंबा आवाक्या बाहेर आहे.
कोकणातील हवामान बदल, अवकाळी पाउस यामुळे आंबा उत्पादन मोठ्याप्रमाणात घटले आहे. त्यामुळे एप्रिल महिना आला तरी अजूनही बाजारात आंब्याची कमतरता भासत आहे. आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दामुळे हापूस आंब्याची या देशांमध्ये होणारी निर्यात पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे आज स्थानिक बाजार पेठेत रत्नागिरी, देवगड हापूस आंबा दिसत आहे. युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली नसती तर यंदा आंब्याचा गोडवा चाखणे सर्वसामान्यांसाठी मुश्कील बनले असते. पण या आव्हानात्मक परिस्थितीत कोल्हापूरात आंबा आवक वाढली आहे. दर हळूहळू कमी होत आहे. काही दिवसात आंबा आवाक्यात येईल, असे आंबा व्यापार्यांकडून सांगितले जात आहे.
दर सरासरी आठशे रुपये
हापूस आंब्याचा सरासरी दर आठशे रुपये बॉक्स असा आहे. समितीमध्ये रविवारी आंब्याचा दर कमी 300 तर जास्तीत जास्त 1200 रुपये प्रति बॉक्स असून सरासरी दर 800 रुपये आहे.