कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून पती-पत्नीवर कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी एकास अटक केली. चंदर ऊर्फ पिंटू राजू लोंढे (वय ४०) असे त्याचे नाव आहे. या घटनेत विष्णू मरिबा बल्लाळ (वय ४५, रा. दत्त मंदिरशेजारी, राजेंद्रनगर) यांच्यासह त्यांची पत्नी जखमी झाल्या आहेत. बुधवारी (दि. १५) रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
राजेंद्रनगरधील बल्लाळ आणि लोंढे यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून वाद धुमसत आहे. या वादातून राजेंद्रनगर येथील झोपडपट्ट्या पेटविल्या होत्या. या प्रकरणी चंदर लोंढे याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. यानंतर दोन्ही कुटुंबातील वाद आणखीन भडकला होता. बुधवारी रात्री बल्लाळ दाम्पत्य घरी असताना चंदर लोंढे कोयता घेऊन घरात शिरला. त्याने केलेला वार चुकविण्याच्या प्रयत्नात कोयता हातावर लागल्याने विष्णू बल्लाळ जखमी झाले. यावेळी धक्काबुक्कीत त्यांची पत्नीही किरकोळ जखमी झाली. राजारामपुरी पोलिसांनी संशयित लोंढे याला अटक केली.